

टीएमसीमधील अंतर्गत वादामुळे १०० नगरसेवकांनी राजीनामे दिले.
बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात नाराजी वाढली.
खासदार काकोली घोष यांनीही उघड नाराजी व्यक्त केली.
बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) पराभवानंतर पक्षात अंतर्गत वाद सुरू झाला आहे. टीएमसी खासदार काकोली घोष यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे, तर टीएमसी-नियंत्रित नगरपालिकांमधील अंतर्गत कलह सुरू झाला असून सामूहिक राजीनाम्यांची लाट आली आहे. राज्यात ज्या ज्या महापालिकेत टीएमसीची सत्ता आहे, त्या पालिकेतील एक-एक, दोन-दोन अशा शंभर नगरसेवकांनी राजीमाना दिलाय.
मंगळवारी, काकोली यांच्यासह पक्षाचे सहा आमदार बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या प्रशासकीय आढावा बैठकीला उपस्थित राहिले. यामुळे बंगालच्या राजकारणात याचे दूरगामी परिणाम होतील असा अर्थ लावला जातोय. काकोली यांनी नुकताच जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. अशात भाजप सरकारच्या अधिकृत व्यासपीठावर नेत्यांच्या उपस्थितीने राजकीय चर्चेला अधिकच खतपाणी घातलंय.
काकोली घोष यांच्यासह देगंगा येथील टीएमसी आमदार अनिसूर रहमान बिस्वास, स्वरूपनगरमधील बिना मंडल, हरोआ येथील मोहम्मद अब्दुल मतीन आणि बसीरहाट भागातील इतर तीन आमदारही बैठकीला उपस्थित होते.
भाजपच्या सभेत उत्तर २४ परगणा, नादिया आणि हुगळी जिल्ह्यांतील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, राजकीय निरीक्षकांच्या मते काकोली घोष यांची उपस्थिती केवळ प्रशासकीयच नव्हे, तर राजकीयदृष्ट्याही महत्त्वपूर्ण ठरतेय.
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी याला पश्चिम बंगालच्या जुन्या राजकीय संस्कृतीपासून वेगळा असा एक नवीन उपक्रम म्हटलंय. ते म्हणाले की, "आम्ही विरोधी पक्षात असताना आम्हाला प्रशासकीय बैठकांना आमंत्रित केले जात नव्हतं.
आम्ही सर्व आमदारांना आमंत्रित करण्याचे ठरवलंय. बारासातच्या खासदारांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. बसीरहाटमधील विरोधी पक्षाचे अनेक आमदारही आलेत. आम्ही त्यापैकी एकाला बोलण्याची संधीही दिली." जनतेला दुहेरी इंजिन असलेल्या सरकारचा फायदा झाला पाहिजे. राजकीय घडामोडी केवळ निवडणुकांच्या काळातच व्हायला हव्यात; आम्ही वर्षभर रचनात्मक काम करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान विरोधी पक्षाच्या कार्यक्रमात नेत्यांनी हजेरी लावल्यामुळे टीएमसीमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला. यामुळे पक्षात असंतोष असल्याची अटकळ निर्माण झाली, त्यामुळे शुभेंदू अधिकारी यांच्या बैठकीतील उपस्थिती राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जाते. या बैठकीला उपस्थित असलेल्या टीएमसी आमदारांनी सांगितले की, ते केवळ विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तेथे आले होते. परंतु त्यांच्या अशा जाण्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांत विविध नगरपालिकांमधील जवळपास १०० नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. या राजकीय उलथापालथीमुळे, आतापर्यंत प्रामुख्याने तृणमूल काँग्रेसच्या नियंत्रणाखाली असलेल्या नगरपालिकांमध्ये आपली पकड मजबूत करण्याची संधी भाजपला मिळाली आहे.
हे संकट इतके गंभीर झाले आहे की, पुढील वर्षी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकांआधीच अनेक पालिका मंडळे बरखास्त केली जाऊ शकतात.आज तक बांगलाच्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी यांचे निकटचे सहकारी असलेले कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांनीही राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्याची जोरदार चर्चा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.