

केंद्रातील सत्तेची वाट ज्या राज्यातून जातेय, त्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका येत्या काही महिन्यांत म्हणजेच २०२७ मध्ये होणार आहेत. त्यामुळे राज्याची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आतापासूनच निवडणुकांचे वारे जोराने वाहू लागले आहेत. भाजपसह प्रमुख पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या रविवारी वेगवेगळ्या बैठका झाल्या. त्यात संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीच्या दृष्टीने पक्षासमोर असलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी रणनीती आखण्यावर भर देण्यात आल्याचे सांगण्यात येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू होणाऱ्या सेवा संकल्प अभियानाबाबत भाजपने कार्यशाळेचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी, पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस स्मृती इराणी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्यासह पक्षाचे ९८ जिल्हाध्यक्ष या कार्यशाळेला उपस्थित होते.
महिनाभरात १३ विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आणि यश तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपवणार
लाभार्थ्यांच्या घरांपर्यंत पोहोचणे, विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्यावर भर देण्यात आला.
हे कार्यक्रम केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष जमिनीवर त्याचा प्रभाव दिसला पाहिजे
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पक्षाच्या ७५ जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली. कार्यकर्त्यांना बूथ स्तरावर सक्रिय राहण्याचे निर्देश दिले. भाजपकडून सपाच्या समर्थकांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक बूथवर सतर्क राहून मतदारयादीशी संबंधित कामांवर बारीक लक्ष ठेवावे, अशाही सूचना त्यांनी केल्या. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून प्रचार मोहीम अधिक तीव्र करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनीही पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. संघटनात्मक तयारीचा आढावाही त्यांनी घेतला. निवडणुकांपूर्वी महिलांसह विविध घटकांसाठी केल्या जाणाऱ्या घोषणा आणि आश्वासनांमागील सत्य जनतेसमोर मांडण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. राजकीय पक्षांची निवडणुकीतील आश्वासने आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील तफावत जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.
राज्याचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनी एसटीएफबाबत अखिलेश यादवांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. एसटीएफने माफियांना उद्ध्वस्त करून गुंडाराज संपवले आहे. अखिलेश यादव यांच्या काळातही एसटीएफ होते, परंतु त्यांनी स्वतः गुन्हेगारांना संरक्षण दिले आणि प्रत्येक जिल्ह्यात माफिया निर्माण केले, असा घणाघात सिंह यांनी केला. लखनऊमध्ये एसएसपी बंगल्याबाहेर पोलिसांना फरफटत नेले जायचे. तुरुंगातून गुन्हेगार थेट महासंचालक कार्यालयात जायचे. आज योगी सरकार आहे; जर कोणी पोलिसांच्या कॉलरला हात लावला, तर गुन्हेगाराची खैर नाही. पोलिसांचे मनोबल उंचावले असून अखिलेश यादव यांना कायद्याचे राज्य सहन होत नाहीये, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.