UP News: उत्तर प्रदेशमधून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. उत्तर प्रदेशच्या इटावा येथे नदीच्या काठावर रील्स बनवणं २ अल्पवयीन मुलांच्या जीवावर बेतलं आहे. इटावा येथील सेंगर नदी काठावर रील्स बनवताना दोन चुलत भाऊ पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोन चुलत भाऊ त्यांच्या आजीच्या कार्यासाठी दिल्लीतून इटावा येथे आले होते. रेहान आणि चांद हे दोघे नदीजवळ सहज फिरण्यासाठी गेले. हे दोघे रील्स काढताना सेंगर नदीत बुडाले. त्यानंतर गावातील लोक घटनास्थळी पोहोचले. तसेच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली.
धक्कादायक म्हणजे नदीत बुडालेल्या दोन भावांपैकी १७ वर्षीय रेहानचा मृतदेह हाती लागला आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तर १३ वर्षीय चांदचा शोध सुरू आहे.
चांदला शोधण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. नातेवाईकांनी सांगितले की, दोघे भाऊ दिल्ली बदरपूर सीमाभागातून इटावा येथे आले होते. दोघे भाऊ नदीच्या काठावर फोटो देखील काढत होते. त्यावेळी रेहान पाय घसरून नदीत पडला. त्यावेळी त्याला वाचविण्यासाठी लहान भाऊ चांद धावला. मात्र, दोघेही पाण्यात बुडाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दोन तासांच्या मेहनतीनंतर रेहानचा मृतदेह नदीतून बाहेर काढला.
रेहान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असायचा. रेहान आणि त्याचा भाऊ नदीच्या काठावर रील्स आणि फोटो काढण्यासाठीच गेले होते. सात दिवसांपूर्वीच या दोघांच्या आजीचं निधन झालं होतं.
या आजीच्या कार्यासाठी दोघे दिल्लीतून इटावा येथे आले होते. गावातील मित्रांसोबत नदी काठावर जाऊन रील्स आणि फोटो काढणे त्यांना चांगले महागात पडले आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.