

तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह पुन्हा आला समोर
ममता बॅनर्जी यांच्या महत्त्वाच्या बैठकीला ६० आमदार गैरहजर
अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्यानंतर बैठक बोलावण्यात आली होती.
राज्यातील सत्ता गेल्यानंतर तृणमूल काँग्रेसमधील अतंर्गत कलह समोर आला आहे. टीएमसीच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत. खासदार अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या मुद्द्यावर पक्षप्रमुख ममता बॅनर्जीनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचवेळी मात्र पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आलेत.
हल्ल्याच्या या प्रकरणावरून रणनीती ठरवण्यासाठी पक्षाची पुन्हा नव्याने मोटबांधण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी पक्षातील नेत्यांची बैठक बोलवली. मात्र या बैठकीत पक्षातील वाद समोर आला. बैठकीला तब्बल ६० आमदारांनी दांडी मारली. तर २० आमदार उपस्थित होते. रविवारी दुपारी कोलकात्यातील कालीघाट येथील ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
मात्र या बैठकीला फक्त २० आमदार उपस्थित राहिले तर ६०आमदारांनी दांडी मारली. आमदार गैरहजर राहिल्याने पश्चिम बंगालच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांनी यावरून तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचा दावा केला आहे. पक्षातील अनेक आमदार अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्याभोवती उभारल्या जात असलेल्या ‘सहानुभूतीच्या राजकारणा’शी सहमत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मात्र तृणमूल काँग्रेसने या दाव्यांचे खंडन केलंय. पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अनुपस्थित असलेले आमदार आंदोलनाच्या तयारीत व्यस्त होते. त्यांनी बैठकीस उपस्थित राहता येणार नसल्याची माहिती पक्ष नेतृत्वाला दिली होती. पक्षाच्या मते आमदारांच्या अनुपस्थितीचा अर्थ मतभेद असा लावणे चुकीचा आहे. सर्वजण पक्षाच्या आंदोलन कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी असल्याचं पक्षाकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान बैठकीत अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्यांविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच २ जून रोजी कोलकात्यात मोठे धरणे आंदोलन आयोजित करण्याचाही निर्णय झाला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः ममता बॅनर्जी करणार आहेत.
भाजप मुख्यमंत्र्याच्या बैठकीला हजर राहणाऱ्या आपल्या दोन आमदारांना टीएमसीनं निलंबित केलं आहे. रितब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा हे दोन्ही आमदार ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे नेते आहेत, मात्र त्यांनी भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे टीएमसीनं त्यांना निलंबित केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.