Air Ambulance Crash Jharkhand Death Toll Update : गंभीर आजाराच्या रूग्णांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा (एअर अॅम्ब्युलन्स) भीषण अपघात झालाय. यामध्ये रूग्णासह विमानातील सातही जणांचा मृत्यू झाला आहे. झारखंडमधील चतरा जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे. पोलिस उपायुक्तांनी ७ जणांच्या मृत्यूच्या वृत्ताला पीटीआयशी बोलताना दुजोरा दिला. तातडीच्या उपचारासाठी सोमवारी रात्री विमान रांचीमधून दिल्लीकडे रवाना झाले होते. पण ते अचानक रडारावरून गायब झाले, त्यानंतर त्याचा भयंकर अपघात झाला. चतरा जिल्ह्यातील सिमरियाजवर विमान कोसळल्यामुळे ७ जणांचा मृत्यू झाला.
सोमवारी संध्याकाळी रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अॅम्ब्युलन्स झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील सिमरियाजवळ अपघात झाला. सुरूवातीला या अपघातात फक्त एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याबाबतचे वृत्त समोर आले होते. पोलिस उपाययुक्तांनी या दुर्घटनेबाबत माहिती देताना विमानातील सर्व सात जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी दिली. पीटीआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.
रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड विमानाने रांची विमानतळावरून संध्याकाळी ७.११ वाजता उड्डाण केले होते. त्यानंतर काही वेळात रडारावरून गायब झाले अन् अपघात झाला. चतरामधील उपायुक्त कीर्तीश्री यांनी पीटीआयला सांगितले की, एअर अॅम्ब्युलन्समधील सर्व सात जणांचा अपघातात मृत्यू झाला. विमान रांचीहून दिल्लीला जात होते. विमान संध्याकाळी ७:३० च्या सुमारास बेपत्ता झाले. ते सिमरियाच्या बरियातु पंचायत परिसरात कोसळले.
दुर्घटनेनंतर घटनास्थळावर तात्काळ स्थानिक पोलिसांनी आणि बचाव पथकाने धाव घेतली. दुर्घटनाग्रस्त विमानातील सर्व सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. कॅप्टन विवेक विकास भगत, कॅप्टन सवराजदीप सिंग, संजय कुमार, डॉ. विकास कुमार गुप्ता, सचिन कुमार मिश्रा, अर्चना देवी आणि धुरू कुमार या सात जणांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. खराब हवामान अपघाताचे एक कारण असू शकते, परंतु नेमके कारण चौकशीनंतरच कळेल, अशी माहिती रांची विमानतळाचे संचालक विनोद कुमार यांनी पीटीआयला दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.