देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील चार व्यक्तीमत्वांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन सन्मानित केले. यामध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पी.व्ही. नरसिंह राव, कृषी शास्त्रज्ञ डॉ एमएस स्वामीनाथन आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचा समावेश आहे.
भारतरत्न पुरस्कार प्रदान..
माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचा भारतरत्न पुरस्कार त्यांच्या मुलाने पीव्ही प्रभाकर राव यांनी स्वीकारला. तसेच एम.एस.स्वामिनाथन यांचा भारतरत्न पुरस्कार त्यांच्या कन्या डॉ.नित्या राव यांनी स्वीकारला. त्याचबरोबर कर्पूरी ठाकूर यांचा भारतरत्न पुरस्कार त्यांचा मुलगा रामनाथ ठाकूर यांना स्वीकारला तर चौधरी चरण सिंह यांचा भारतरत्न पुरस्कार त्यांचे नातू जयंत चौधरी यांच्याकडे देण्यात आला.
राष्ट्रपती, पंतप्रधानांनी केली होती घोषणा
राष्ट्रपती मुर्मू यांनी कर्पूरी ठाकूर यांना त्यांच्या 100 व्या जयंतीच्या एक दिवस आधी म्हणजेच 23 जानेवारी रोजी भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. कर्पूरी ठाकूर हे दोनदा बिहारचे मुख्यमंत्री आणि एकदा उपमुख्यमंत्री होते. मागासवर्गीयांच्या प्रश्नांसाठी लढा देणारे नेते म्हणून ते ओळखले जातात. त्याचप्रमाणे, 9 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींनी डॉ. एमएस स्वामीनाथन, पीव्ही नरसिंह राव आणि चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न (मरणोत्तर) देण्याची घोषणा केली होती. स्वामीनाथन हे कृषी शास्त्रज्ञ होते. त्यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नरसिंह राव हे देशाचे ९ वे पंतप्रधान होते. चरणसिंग हे भारताचे पाचवे पंतप्रधान होते. तसेच ते उत्तर प्रदेशचे 5 वे मुख्यमंत्री देखील होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी समर्पित केले होते. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार होते, मात्र आज ते राष्ट्रपती भवनात हजर राहिले नसून 31 मार्च रोजी राष्ट्रपती त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.