नवी दिल्ली : देशात उद्या सकाळपासून नवे जीएसटी दर लागू होणार आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयाचा देशातील लाखो लोकांना फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी ५ वाजता भारतीयांना संबोधित करत या नव्या जीएसटी दराविषयी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवरात्रीच्या आदल्या दिवशी नवा नारा दिलाय. गर्वाने सांगा आम्ही स्वदेशी आहोत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच यावेळी भारतीयांचे वर्षाला अडीच लाख कोटी वाचणार असल्याचेही मोदींनी नमूद केले.
नवरात्रौत्सवचा शुभारंभ उद्यापासून सुरु होत आहे. या उत्सवाच्या पहिल्याच दिशी भारत आत्मनिर्भर होण्याच्या दिशने पाऊल टाकण्यासाठी मोठं पाऊल टाकत आहे. २२ सप्टेंबर रोजी सकाळपासून नवा जीएसटी कायदा लागू होईल. भारतात उद्यापासून जीएसटी बचत उत्सव सुरु होत आहे. जीएसटी बचत उत्सवातून मोठी बचत होईल. तुम्हाला आवडीच्या वस्तू खरेदी करता येईल.
देशातील अनेकांना बचत उत्सवाचा फायदा होईल. या सणामुळे सर्वाचं तोंड गोड होणार आहे. अनेक कुटुंब आनंदीत होणार आहेत. देशातील कोट्यवधी कुटुंबांना जीएसटी दराची आणि बचत उत्सवाच्या शुभेच्छा देतोय.
जीएसटीतील हा बदल भारताचा ग्रोथ वाढवणार आहे. यामुळे व्यवसाय अधिक सुलभ होणार आहे. गुंतवणूक अधिक वाढणार आहे. प्रत्येक राज्य विकासाच्या शर्यतीत सामील होणार आहे. २०१७ मध्ये भारताने जीएसटी सुरू केला होता. त्यावेळी जुना इतिहास बदलण्याची सुरूवात केली. आपल्या देशातील जनता,व्यापार वेगवेगळ्या टॅक्समध्ये गोंधळलेले होते.
एका शहरातून दुसर्या शहरात माल टाकायचे म्हटले तरी किती चेकपोस्ट, फॉर्म भरावे लागत होते. प्रत्येकजागी टॅक्ससाठी वेगवेगळे नियम होते. २०१४ मध्ये मला पंतप्रधान म्हणून निवडले. त्यावेळी सुरुवातीला विदेशी वर्तमानपत्रात एक उदाहरण छापले होते. एका कंपनीचा उल्लेख होता. त्यांनी म्हटले होते की, बंगळुरूमधून ५०० किमी हैदराबादला सामान पाठवायचे, कठीण होतं. बंगळुरूवरून सामान युरोपला पाठवले जायचे. तेथून हैदराबादला पाठवणं कंपनी पसंत करायची. ही तेव्हाची अशी परिस्थिती होती. त्यावेळी अशा लाखो कंपनी, लोकांना वेगवेगळ्या टॅक्समध्ये अडकवले होते. त्याचा त्रास सहन करावा लागत होता.
देशाला या स्थितीमधून काढणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे तुम्ही मला २०१४ मध्ये संधी दिल्यावर देशहितासाठी जीएसटीला प्राथमिकता दिली. प्रत्येकासोबत चर्चा केली. प्रत्येक राज्याची अडचण दूर केली. प्रत्येक प्रश्नांचे उत्तर शोधले. सर्वांना सोबत घेत जीएसटी शक्य झालं. हे केंद्र आणि राज्याच्या प्रयत्नाचे यश होतं. यामध्ये देश वेगवेगळ्य टॅक्समधून मुक्त झाला. देशात वन नेशन वन टॅक्सचं स्वप्न पूर्ण झालं.
बदल ही प्रक्रिया चालूच राहते. देशाच्या गरजेनुसार त्यात बदल केला जातोच. देशाची सध्याची परिस्थिती आणि स्वप्नांना पाहून हे लागू होतेय. देशात आता फक्त ५ आणि १८ हे दोन टॅक्स राहणार आहे. दैनंदिन वापरातील वस्तू, खाण्यापिण्याची गोष्टी, साबण, पेन, विमा यासारख्या गोष्टी स्वस्त होणार आहे. ज्या सामानावर आधी १२ टक्के टॅक्स होता, त्यामधील ९९ टक्के वस्तूंवर आता फक्त ५ टक्के स्लॅबमध्ये आल्या आहेत.
मागील ११ वर्षात देशात २५ कोटी लोकांनी गरिबीला हरवलं आहे. मोठ्या प्रमाणात लोक गरिबीतून बाहेर येत मध्यमवर्गात आला आहे. या सर्वांचे आपली स्वत:ची स्वप्ने आहेत. या वर्षी सरकारने १२ लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री करत भेट दिली. १२ लाख रूपयांचे उत्पन्न कर मुक्त केल्यानंतर मध्यमवर्गींच्या जीवनात मोठा बदल झाला. आता गरीब, नव्या मध्यमवर्गीयांना जीएसटीमुळे फायदा होणार आहे. जीएसटी कमी झाल्यामुळे देशातील नागरिकांना स्वप्न पूर्ण करणं अधिक सोपं होणार आहे.
घर, टीव्ही, फ्रीज, स्कूटर, बाईक, कार खरेदी करणं आता अधिक स्वस्त होणार आहे. तुमच्यासाठी फिरणंही स्वस्त होणार आहे. हॉटेलमधील रूमचा जीएसटीही कमी केलाय. दुकानदारही या बदलामुळे उत्साहात आहेत. ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक ठिकाणी याबाबत बोर्ड लावला जातोय. नागरिक देवो भव या मंत्रानुसार आपण पुढे जात या बदलाची झलक दिसतेय.
इनकॅम टॅक्समध्ये सूट आणि जीएसटीमधील बदलामुळे अडीच लाखांची बचत होणार आहे. त्यामुळे हा बचत उत्सव आहे. भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी लघु, कुटीर अन् मध्यम उद्योगावर मोठी जबाबदारी आहे. ज्या गोष्टी देशात तयार होतात, त्या आपल्याला इथेच तयार करायच्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.