

नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात महापुरामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. पुरामुळे किमान आठ जणांचा मृत्यू झाला आणि वस्त्या व पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेनंतर १०० हून अधिक भारतीय बेपत्ता असल्याचे वृत्त हाती आले आहे. बुधवारी सकाळी भोटे कोसी नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे पूर आला. यामुळे रसुवा सीमा नाक्यावरील तिमुरे बाजार आणि सीमाशुल्क (कस्टम्स) परिसराचे मोठे नुकसान झाले.
पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अनेक वाहने वाहून गेली. या पुराचा फटका तेरा जलविद्युत प्रकल्पांनाही बसला आहे. बाधित भागात सध्या बचाव कार्य सुरू आहे. नेपाळ पर्यटन मंडळाच्या माहितीनुसार, १०५ भारतीय नागरिकांसह ३०० हून अधिक पर्यटक आणि ट्रेकर्सचा अद्याप पत्ता लागलेला नाही. पुरामुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी १५ हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत.
स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ च्या सुमारास भोटे कोसी नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. त्यानंतर नदीचं पाणी रसुवागढी-तिमुरे भागात शिरलं. रसुवासह शेजारील नुवाकोट आणि धाडिंग जिल्ह्यांतील काही भागालाही पूराचा फटका बसलाय. पुरामुळे वाहने, मालसामान, पूल आणि इतर पायाभूत सुविधा वाहून गेल्या, तसेच अनेक जलविद्युत प्रकल्पांचेही नुकसान झाले.
'नेपाळ न्यूज'च्या वृत्तानुसार, नेपाळ पर्यटन मंडळाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अचानक आलेल्या पुरामुळे ३८४ प्रवासी बेपत्ता झाले आहेत. यात २९१ परदेशी नागरिक आणि ९३ नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. या परदेशी नागरिकांपैकी १०५ जण भारताचे आहेत. या यादीत ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, अमेरिका, मलेशिया, युनायटेड किंगडम आणि दक्षिण आफ्रिका येथील प्रवाशांचाही समावेश आहे.
तर काही इतरांच्या राष्ट्रीयत्वाची अद्याप खात्री व्हायची आहे. पर्यटन मंडळाने सांगितले की, ही माहिती प्राथमिक स्वरूपाची असून ट्रॅव्हल एजन्सी, मार्गदर्शक (गाईड्स), स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा यांच्या समन्वयाने तिची पडताळणी केली जातेय. पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष न काढण्याचे आवाहन त्यांनी पर्यटक आणि त्यांच्या कुटुंबीयांना केले आहे.
बेपत्ता असलेल्यांमध्ये कैलास मानसरोवर यात्रेकरूंचा समावेश आहे. संपर्क तुटलेल्यांपैकी मोठ्या संख्येने लोक कैलास मानसरोवर यात्रेसाठी तिबेटला निघालेले यात्रेकरू असल्याचे मानले जात आहे. काठमांडूस्थित 'टच कैलास ट्रॅव्हल्स अँड टूर्स'चे व्यवस्थापकीय संचालक बासू कुमार अधिकारी यांनी सांगितले की, ९३ नेपाळी नागरिकांसह एकूण ३९० यात्रेकरू बुधवारी सीमा ओलांडणार होते. काही जण वगळता, दुपारी ३ वाजेपर्यंत आम्हाला यात्रेकरूंशी संपर्क साधता आलेला नसल्याची माहिती अधिकाऱ्याने दिलीय. याबाबतचे वृत्त 'द काठमांडू पोस्ट'नं दिलंय.
नेपाळच्या 'राष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणा'ने रसुवा, नुवाकोट, धाडिंग, चितवन आणि गोरखा यांसारख्या नदीच्या पात्राताल लागून असणाऱ्या अनेक जिल्ह्यांना 'हाय अलर्ट'वर (उच्च सतर्कतेवर) ठेवले आहे. अधिकाऱ्यांनी त्रिशुली आणि इतर नद्यांच्या काठावर राहणाऱ्या लोकांना नदीकिनारी न जाता सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केलंय. बाधित भागातील पर्यटकांनाही शांत राहण्याचा, माहिती घेत राहण्याचा आणि अधिकृत सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
स्थानिक माध्यमांनुसार, ज्यांना आपत्कालीन मदतीची आवश्यकता आहे ते १२३४, ११४४ या क्रमांकांवर किंवा ९८५१२८९४४५ या क्रमांकावर पर्यटक पोलिसांशी संपर्क साधू शकतात, किंवा जवळच्या पोलीस किंवा सुरक्षा चौकी, स्थानिक प्रशासन, ट्रॅव्हल एजन्सी, गाईड किंवा टूर ऑपरेटर यांना माहिती देऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.