
कंगना रनौतला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका
मानहानी खटला रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणीस नकार
हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टातही कंगनाच्या पदरी निराशा
अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौतला सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. मानहानीचा खटला रद्द करण्याच्या मागणीच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला. कंगनाने शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट केली होती. त्यावरून कंगनाविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. हा खटला रद्द करण्यासाठी तिनं हायकोर्टात आणि नंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, पदरी निराशाच आली. याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर कोर्टाच्या सूचनेवरून कंगनाच्या वतीने दाखल याचिका मागे घेण्यात आली.
सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात कंगनाच्या वकिलांना विचारणा केली. तुम्ही केलेल्या टिप्पणीबाबत काही सांगायचे आहे का? तुम्ही तर खूप 'तिखट-मीठ' लावून सांगितलेले आहे. हे काही सामान्य रिट्विट नव्हते. कंगनाच्या याचिकेवर न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत कंगनाने केलेल्या टिप्पणीवर आक्षेप नोंदवण्यात आला. दरम्यान हे प्रकरण २०२०-२१ मधील शेतकरी आंदोलनाशी संबंधित आहे. त्यावर कंगनाने ट्विट केले होते. त्यामुळं कंगनाविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.
कंगनाने त्या टिप्पणीवर स्पष्टीकरण दिलेले आहे, असे वकिलांनी खंडपीठासमोर सांगितले. ते ट्विट कुणी तिसऱ्याच व्यक्तीने केले होते. कंगनाने केवळ ते रिट्विट केले होते, असेही त्यांनी सांगितले. कंगनाच्या वकिलांनी सांगितले की, त्या पंजाबमध्ये सुनावणीसाठी उपस्थित राहू शकत नाहीत. त्यावर कनिष्ठ न्यायालयात असे स्पष्टीकरण दिले जाऊ शकते, असे न्या. मेहता यांनी सांगितले.
तुम्ही दिलेले स्पष्टीकरण कनिष्ठ न्यायालयासाठी आहे. हा ट्रायल कोर्टाचा विषय आहे. आम्हाला तुमच्या ट्विटवर टिप्पणी करण्यास सांगू नये. त्यामुळे तुमच्या खटल्यावर त्याचा प्रतिकूल प्रभाव पडू शकतो. तुम्ही याचिका मागे घ्यावी, असे खंडपीठाकडून सूचवण्यात आले. त्यावर कंगनाच्या वकिलांनी याचिका मागे घेतली.
पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने कंगनाची याचिका फेटाळली होती. त्यानंतर तिने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. कथित मानहानीकारक पोस्ट सद्भावनेने केली होती, हे सिद्ध करण्यात कंगना अपयशी ठरल्याचा निर्णय हायकोर्टाने दिला होता. दरम्यान, कंगना रनौतच्या विरोधात जानेवारी २०२१ मध्ये भटिंडामध्ये महिंदर कौर यांनी तक्रार दाखल केली होती. भाजप नेत्या कंगना यांनी एका रिट्विटमध्ये त्यांच्याविरोधात खोटं पसरवणारी टिप्पणी केली होती, असा दावा त्या तक्रारीत करण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.