India-China Clash : ड्रॅगनची वक्रदृष्टी, ५ घटना अन् जिगरबाज भारतीय जवान; कसा हाणून पाडला चिन्यांचा डाव?

India-China Clash : १९६२ नंतर भारत आणि चीनमध्ये कधी आणि केव्हा वाद झाले? याबद्दल जाणून घेऊयात.
India-China Clash Update / File
India-China Clash Update / FileSAAM TV

India- China Clash Updates : ताबारेषेजवळ अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील काही क्षेत्रांवरून भारत आणि चीन या दोन्ही देशांत वाद आहेत. दोन्ही बाजूने आपापल्या सीमाभागात गस्त घातली जाते. सन २००६ पासून हा प्रकार सुरू आहे. ९ डिसेंबर २०२२ रोजी चिनी सैनिकांनी ताबा रेषेजवळ तवांग सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला. चिनी सैनिकांचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला. त्यानंतर दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाली. यात दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनेनंतर वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही बाजूचे सैनिक मागे हटले. झटापटीनंतर दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक महत्वाची बैठकही झाली.

सन १९६२ मध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांत युद्ध झालं होतं. तेव्हापासून आतापर्यंत भारत-चीन सैन्यामध्ये तणाव वाढला आहे. बाचाबाची, झटापटी आणि हिंसक घटनाही घडल्या आहेत. दोन्ही देशांमधील संघर्षात आतापर्यंत अनेक सैनिकांना प्राण गमवावे लागले आहेत. १९६२ नंतर भारत आणि चीनमध्ये कधी आणि केव्हा वाद झाले? याबद्दल जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

India-China Clash Update / File
India China Dispute : तवांगमध्ये नेमकं काय घडलं, संरक्षण मंत्र्यांनी संसदेत दिली माहिती

सन १९६७ - नाथू ला जवळ भिडले

चीन सैन्य आणि भारतीय जवानांमध्ये नाथू ला येथे ११ सप्टेंबर १९६७ मध्ये वाद झाला. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) ने नाथू ला मध्ये भारतीय चौक्यांवर हल्ला चढवला. हा संघर्ष १५ सप्टेंबर १९६७ पर्यंत सुरू होता.

सन १९६७ - चो-ला जवळ हिंसक झटापट

चीनकडून वारंवार एलएसीजवळ हिंसक घटना घडवून आणल्या जातात. १९६७ मध्येच त्यांनी ऑक्टोबरमध्ये पुन्हा नापाक चाल खेळली. १ ऑक्टोबरला चीन सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये चो लाजवळ हिंसक झटापट झाली. त्यात भारतीय जवानांनी तो हल्ला परतवून लावला होता. नाथू लाच्या उत्तरेकडे हे क्षेत्र आहे. (India China)

India-China Clash Update / File
India-china Border: भारत-चीन सैनिकांमध्ये झटापट, दोन्ही देशांचे सैनिक जखमी

सन १९७५ - अरुणाचलच्या तुलुंगमध्ये संघर्ष

२० ऑक्टोबर १९७५ मध्ये अरुणाचल प्रदेशच्या तुलुंग ला मध्ये चिनी सैनिकांनी भारताच्या गस्ती पथकावर हल्ला केला होता. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे चार जवान शहीद झाले होते. अधिकृतरित्या भारतानं दावा केला होता की, २० ऑक्टोबर १९७५ रोजी चिनी सैन्यानं तुलुंग लाच्या दक्षिणेकडे भारतीय हद्दीत प्रवेश केला आणि आसाम रायफल्सच्या जवानांवर हल्ला केला. चिनी सैन्यानं केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय लष्कराचे चार जवान शहीद झाले होते.

सन १९८७ : तवांगमध्ये सैनिकांमध्ये वाद

अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या उत्तरेकडे १९६२ च्या युद्धानंतर १९८७ मध्ये सुमदोरोंग चू येथील घटना सर्वात मोठी होती. भारत आणि चीन युद्धाच्या उंबरठ्यावर होते. लष्कर प्रमुख जनरल के. सुंदरजी यांनी चीनच्या आक्रमक चाली रोखण्यासाठी ऑपरेशन फाल्कन अंतर्गत मोठ्या संख्येने भारतीय जवानांना हवाई मार्गे चीन-भारत सीमेवर पोहोचवले.

सन २०१७ : डोकलाममध्ये सैन्य आमनेसामने

सिक्कीम-भूतान-तिबेट ट्र्रायजंक्शनजवळ डोकलामच्या भागात ७३ दिवस संघर्षानंतर भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना रस्ता बांधण्यापासून रोखले होते. डोकलाम तिबेटमधील चुंबी घाटी, भूतानची हा घाटी आणि सिक्कीममध्ये घेरला गेला होता.

सन २०२० - गलवानमध्ये हिंसक संघर्ष

१५ जून २०२० रोजी लडाखमध्ये एलएसीवर चिनी सैन्यासोबत उफाळून आलेल्या संघर्षात एका कर्नलसह भारतीय सशस्त्र दलाचे २० जवान शहीद झाले होते. भारतीय जवानांनी चीनच्या अनेक सैनिकांना टिपलं होतं. त्याची माहिती अद्यापही चीनने दडवून ठेवली आहे. गलवानमध्ये भारत-चीन यांच्यात अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com