

बांगलादेशच्या जशोरमध्ये हिंदू पत्रकाराची निर्घृण हत्या
डोक्यात ३ गोळ्या झाडून आणि गळा चिरून हत्या
मृत पत्रकार दैनिक बीडी खबरचे कार्यवाहक संपादक होते
बांगलादेशमध्ये १८ दिवसांत ६ हिंदू व्यक्तींची हत्या
बांगलादेशमध्ये हिंदू व्यक्तींच्या हत्येच्या घटना वाढत चालल्या आहेत. गेल्या २४ तासांमध्ये २ हिंदू तरुणांची हत्या करण्यात आली तर गेल्या १८ दिवसांमध्ये ६ हिंदूंची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या सर्व घटना ताज्या असतानाच बांगलादेशमध्ये हिंदू पत्रकाराची निर्घृण हत्या करण्यात आली. बांगलादेशमधील जशोरच्या मणिरामपुरमध्ये हिंदू पत्रकाराची डोक्यात गोळ्या झाडून आणि गळ्या चिरून हत्या करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, राणा प्रताप बैरागी असं हत्या करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव होते. ते जेसोर जिल्ह्यातील केशबपूर येथील अरुआ गावात राहत होते. त्यांचा मणिरामपूर येथील कोपलिया मार्केटमध्ये एक आईस्क्रीमचा कारखाना होता आणि ते दैनिक बीडी खबर या वृत्तपत्राचे कार्यवाहक संपादक होते. त्यांच्या डोक्यात अज्ञातांनी गोळ्या झाडल्या आणि त्यांचा गळा चिरण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राणा प्रताप यांचा जागीच मृत्यू झाला.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक अबुल बसर यांनी सांगितले की, ही घटना सोमवारी संध्याकाळी ५:४५ वाजता कपालिया मार्केटमध्ये घडली. दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी त्यांना आईस्क्रीमच्या कारखान्यातून ओढत बाहेर काढले आणि सोबत नेले. आरोपींनी त्यांना कपालिया मार्केटच्या पश्चिम भागात असलेल्या कपालिया क्लिनिक अँड डायग्नोस्टिक सेंटरसमोरील एका गल्लीत नेले.त्याठिकाणी त्यांच्या डोक्यात जवळून ३ गोळ्या झाडल्या आणि त्यांच्या गळ्यावरून चाकू फिरवला. पत्रकाराची हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या हत्येमागचे कारण समोर आले नाही. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
त्याआधी १८ डिसेंबर रोजी मैमनसिंग शहरात दिपू चंद्र दास (२५ वर्षे) या हिंदू तरुणाला जमावाने बेदम मारहाण करत त्याची हत्या केली होती. कथित ईशनिंदा केल्याच्या आरोपाखाली त्याचा मृतदेह झाडाला लटकवून जाळून टाकण्यात आला होता. २३ डिसेंबर रोजी चितगावच्या बाहेरील राओजन परिसरात कतारमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरित कामगार सुख शिल आणि अनिल शिल यांच्या घराला अज्ञात व्यक्तींनी आग लावली. या घटनेमध्ये ते थोडक्यात बचावले.
३ जानेवारी रोजी खोकन चंद्र दास (५० वर्षे) यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली त्यानंतर त्यांचा मृतदेह जाळून टाकण्यात आला होता. २४ डिसेंबर रोजी पांगशा उपजिल्हातील राजबारी शहरात खंडणीच्या आरोपाखाली जमावाने अमृत मंडल या आणखी एका हिंदू व्यक्तीला मारहाण करत त्याची हत्या केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.