
Bengaluru Stampede News Update : रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (RCB) च्या आयपीएलच्या विजयाचा जल्लोष बुधवारी भयंकर दुर्घटनेत बदलला. एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आणि ३३ जण जखमी झाले. आरसीबीने मंगळवारी अहमदाबाद येथे पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करत १८ वर्षांनतर पहिल्या आयपीएल चषकावर नाव कोरले. या ऐतिहासिक विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी हजारो चाहते बेंगलुरूच्या रस्त्यांवर आणि चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमले होते. मात्र, अपुऱ्या नियोजनामुळे आणि गर्दीच्या व्यवस्थापनातील कमतरतेमुळे हा उत्साह शोकांतिकेत बदलला.
बुधवारी दुपारी आरसीबीच्या खेळाडूंनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर खुल्या बसमधून विजयी मिरवणूक काढण्याचे नियोजन होते, परंतु बेंगलुरू पोलिसांनी गर्दीच्या भीतीने ही मिरवणूक रद्द केली. तरीही, स्टेडियमबाहेर आणि आसपासच्या परिसरात २ ते ३ लाख चाहते जमले होते. स्टेडियमच्या छोट्या प्रवेशद्वारांमुळे आणि प्रवेशासाठी पासेसच्या अनिश्चिततेमुळे चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्यात पोलिसांनी लाठीचार्च केला अन् चेंगराचेंगर झाली. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. तर जखमींमध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मृतांना १० लाखांची मदत -
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या दुर्घटनेसाठी शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याची घोषणा केली. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच आरसीबीने आपला उत्सव अवघ्या १० मिनिटांत थांबवला. “आम्हाला इतक्या मोठ्या गर्दीची अपेक्षा नव्हती,” असे त्यांनी कबूल केले. पोलिसांनी गर्दी नियंत्रित करण्यासाठी किरकोळ बळाचा वापर केला, परंतु स्टेडियमच्या बाहेरील परिस्थिती हाताबाहेर गेली.
विराट कोहली काय म्हणाला ?
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी या दुर्दैवी घटनेवर दुख: व्यक्त केले. विराटने सोशल मीडियावर लिहिले की, तो “पूर्णपणे हादरला” आहे, तर अनुष्काने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शोक व्यक्त केला. बंगळुरूमधील या घटनेमुळे क्रिकेट विश्वात आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
आरसीबीनं काय म्हटले ?
आरसीबी संघाच्या आगमनाच्या अपेक्षेने बेंगलुरूमध्ये विविध ठिकाणी जमलेल्या जनसमुदायाबाबत माध्यमांमधून समोर आलेल्या दुर्दैवी घटनांमुळे आम्ही प्रचंड दुखी आहोत. प्रत्येकाच्या सुरक्षिततेला आणि कल्याणाला आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल आरसीबी खूप शोक व्यक्त करते आणि प्रभावित कुटुंबियांप्रति आमच्या हृदयापासून संवेदना व्यक्त करते. या परिस्थितीची माहिती मिळताच आम्ही तात्काळ आमचा कार्यक्रम बदलला आणि स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाचे आणि सल्ल्याचे पालन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.