
वसई-विरारमध्ये १५ नोव्हेंबरपासून मीटर रिक्षा धावणार
राज्य सरकारने ठरवलेल्या दरांनुसार प्रवाशांकडून भाडे आकारले जाईल
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला मोठा निर्णय
मीटर दर न आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश
वसई-विरारमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच वसई-विरारमध्ये मीटर रिक्षा धावणार आहेत. १५ नोव्हेंबरपासून याठिकाणी मीटर रिक्षा सुरू होणार असून याबाबतचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली. त्यामुळे वसई-विरारमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांना रिक्षाने प्रवास करण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत...
वसई-विरार शहर महानगरपालिकेतील ऑटो रिक्षा १५ नोव्हेंबरपासून मीटरवर चालवल्या जातील. राज्य सरकारने ठरवलेल्या दरांनुसार प्रवाशांकडून भाडे आकारले जाईल. वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव या भागात या मीटर रिक्षा धावतील. वसई-विरारमध्ये रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालली आहे. प्रवाशांकडून अधिकचे पैसे आकारून लूट केली जात आहे. रिक्षामध्ये ३ ऐवजी ४ प्रवाशांना किंवा त्यापेक्षा जास्त जणांना बसवून प्रवास केला जात आहे. जवळच्या प्रवासासाठी देखील जास्त दर आकारले जात आहेत. याबाबत वसई-विरारमधील नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्या होत्या. या सर्व बाबी लक्षात घेऊन परिवहनमंत्र्यांनी मीटर रिक्षाबाबत मोठा निर्णय घेतला.
गेल्या काही वर्षांपासून या भागातील ऑटो-रिक्षा प्रवाशांना कमी अंतरासाठीही चालकांकडून जास्त दर आकारले जात असल्याने समस्या येत आहेत. रहिवाशांच्या अनेक तक्रारींनंतर वसईच्या भाजप आमदार स्नेहा दुबे यांनी सोमवारी सरनाईक यांच्याशी संपर्क साधला आणि या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानंतर सरनाईक यांनी वसई-विरार भागातील वाहतूक विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत रिक्षाचालक अवास्तव जास्त दर आकारतात आणि राज्य सरकारने ठरवलेल्या मीटर दरांनुसार शुल्क आकारण्यास नकार देतात ज्यामुळे प्रवासासाठी रिक्षांवर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांना त्रास होतो. या सर्वबाबी ऐकून घेतल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी वसई-विरारमध्ये यापुढे मीटर रिक्षाच धावतील असा निर्णय घेतला.
प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली की, रेल्वे स्थानकांपासून विविध ठिकाणी जाणाऱ्या मार्गांवर शेअर-ऑटो रिक्षा सध्या आकारल्या जाणाऱ्या दरांवर चालवण्यास परवानगी दिली जाईल. स्वतंत्र प्रवास करणाऱ्या रिक्षांना मीटरवर चालवणे आणि त्यानुसार प्रवाशांकडून शुल्क आकारणे बंधनकारक असेल. सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मीटरनुसार शुल्क न आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. नियम आणि मीटर दरांचे पालन न करणाऱ्यांवर आरटीओ अधिकारी आणि वाहतूक पोलिस कठोर कारवाई करतील असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
वसई, विरार, नालासोपारा आणि नायगावमध्ये १५ नोव्हेंबरपासून मीटर रिक्षा धावतील. मीटर रिक्षा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना दिलासा मिळाले कारण त्यांची रिक्षाचालकांकडून होणारी लूट कमी होईल. प्रवाशांना दीड किलोमीटर प्रवासासाठी २६ रुपये तर मध्यरात्री २९ रुपये दर आकारला जाईल. ४.१० किलोमीटर साठी ७० रुपये तर मध्यरात्री ८८ रुपये दर आकारला जाईल. तर ६.७० किलोमीटर पर्यंतच्या प्रवसासाठी ११५ रुपये मोजावे लागतील. हाच प्रवास मध्यरात्री करताना १४४ रुपये इतके पैसे मोजावे लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.