
प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींवर जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून टीका केली.
काँग्रेस पक्षाने दशकानुदशके ओबीसी व इतर बहुजन समाजाच्या हक्कांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंबेडकरांनी केला.
मंडल आयोग, सोनिया गांधींचा युपीए काळ, आणि २०११ मधील जनगणना मुद्द्यावरही आंबेडकरांनी सवाल केले.
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जातनिहाय जनगणनेवरून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. जातीय जनगणना रोखणं ही चूक नव्हे, हा तर ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांवर केलेला कित्येक दशकांचा गुन्हा आहे, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ॲड. आंबेडकर म्हणाले की, राहुल गांधी हा मोठेपणाचा देखावा थांबवा. तुम्ही म्हणता की जातीनिहाय जनगणना न झाल्याची चूक केवळ तुमची आहे. त्यामुळे ओबीसींना त्यांचा हक्क मिळाला नाही. राहुल गांधी, सर्वप्रथम हे समजून घ्या की ही चूक नव्हे, तर बहुजनांवर केलेला एक गुन्हा आहे. हा गुन्हा तुमच्या आजी इंदिरा गांधी, तुमचे वडील राजीव गांधी, तुमची आई सोनिया गांधी, तुम्ही स्वतः आणि तुमची काँग्रेस पार्टी या सगळ्यांनी मिळून दशकानुदशके बहुजनांवर केला आहे'
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढे म्हटलं की, 'तुमच्या आजी इंदिरा गांधी यांनी मंडल आयोगाचा अहवाल १० वर्षे दाबून ठेवला. तुमचे वडील राजीव गांधी मंडल आयोग लागू करण्यास आणि ओबीसींना आरक्षण देण्यास विरोधात होते. याचे पुरावे त्यांच्या लोकसभेत दिलेल्या भाषणांमध्ये सापडतात. माझे मित्र आणि तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग, माझे सहकारी आणि मी मिळून मंडल आयोगाच्या शिफारसी आणि ओबीसींसाठी २७% आरक्षण लागू केलं. तुमची आई सोनिया गांधी, ज्या यूपीए आघाडीच्या अध्यक्षा होत्या, त्यांनी यूपीए सरकारमध्ये जातीय जनगणनेचा मुद्दा दाबून ठेवला'.
'२०११ मध्ये समाजवादी पक्षांनी जनगणनेत जात नोंदवण्याची मागणी केली, तेव्हा तुमची काँग्रेस पार्टी आणि तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी या मागणीचा विरोध केला. जातीय जनगणनेची मागणी वाढल्यावर शेवटी हार मानून तुमच्या पक्षाने जनगणना केली, पण आजपर्यंत त्या जनगणनेचे आकडे तुम्ही जाहीर केलेले नाहीत. राहुल गांधी, ना तुम्ही दलित समाज समजू शकता, ना त्यांच्या समस्या. हीच बाब आदिवासी, ओबीसी आणि भारतातील अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिम आणि बौद्ध समाज यांच्या बाबतीतही लागू होते. फक्त फोटोशूट करून आणि 'जय भीम' ओरडून कोणालाही बहुजनांच्या समस्या समजत नाहीत. पुढच्यावेळी अर्धवट खोटं नाही, तर पूर्ण सत्य बोला,असे ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.