
उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षणगृहातून ८ अल्पवयीन मुलींनी खिडकीच्या जाळ्या तोडून पळ काढलाय. या मुली १५ ते १७ वयोगटातील असल्याचा अंदाज असून, या आठही मुली मंगळवारी सकाळच्या सुमारास शयनगृहातील जाळ्या तोडून पळून गेल्याची घटना घडलीय. या घटनेची माहिती मिळताच निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात धाव घेत माहिती दिली. पोलिसांनी शोध मोहीम राबवत ७ मुलींना ताब्यात घेतलंय, मात्र एक अद्याप बेपत्ता आहे.
यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, उल्हासनगरच्या मध्यवर्ती ठिकाणी निरीक्षण आणि विशेष गृह आहे. याठिकाणी विविध वयोगटातील मुलींना आणि महिलांना ठेवले जाते. स्टेशन परिसरात फिरणाऱ्या बेघर, अनाथ किंवा भीक मागणाऱ्या, बालकामगार मुलींना शासकीय निरीक्षणगृहात ठेवलं जातं. मात्र यापैकी १५ ते १७ वयोगटातील काही मुलींना निरीक्षणगृहात राहणं आवडत नसल्यानं त्यांनी गुपचूप पळ काढण्याचा मार्ग निवडला.
या निरीक्षण गृहातून मुलींना बाहेर सोडले जात नाही. त्यांच्यावर पाळत ठेवली जाते. मात्र, मंगळवारी सकाळी शयनगृहातील खिडकीच्या लोखंडी जाळ्या तोडल्या आणि एका पाठोपाठ एकीनं उडी घेत पळ काढला. त्यानंतर निरीक्षण गृहातील कर्मचारी फेरफटका मारण्यासाठी आला. मात्र, खोलीत मुली नसून, खिडकीच्या जाळ्या तुटल्या असल्याचे त्याला दिसले.
त्यानं तातडीनं हिललाईन पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नंतर पोलिसांनी विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली. शहरात मुली सापडल्या नाहीत, म्हणून त्यांनी रेल्वे परिसरात शोध मोहीम राबवली. त्यावेळी रेल्वे स्थानकातून पळून जाण्याच्या प्रयत्नात मुली होत्या. सात अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतलं, मात्र एक मुलगी पळून जाण्यात यशस्वी झाली. या प्रकरणी पुढील तपास आणि मुलीचा शोध पोलीस घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.