राज्यात अवकाळी पावसामुळे हवामानात मोठा बदल
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट जारी
वादळी वारे, विजा आणि गारपीट होण्याची शक्यता
पिकांचे मोठे नुकसान
Maharashtra Today 20th March Weather Update News राज्यात उन्हाचा कडाका कमी होऊन पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे. गेले काही दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. काल जालना, वाशीम, नाशिक, पुणे येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच बहुतांश भागात गारपीट झाली. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे. गुरुवारी वाशीम ३८.४ अंश, जळगाव येथे ३७ अंश, अकोला येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली, तर धुळे येथे १५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
IMD च्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.
उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.दरम्यान काल झालेल्या पावसाने राज्याला चांगलेच झोडपले. याचा फटका हंगामी फळांना आणि भाज्यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे वाया गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.