
अजय दुधाणे साम प्रतिनिधी
विधानसभा झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील काही पक्षांनी निवडणुकांच्या तयारीला सुरुवात देखील केली आहे. मुंबई व्यतिरिक्त इतर ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या जातील असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी बांधला जात आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या मुद्यावरुन शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये जुंपली आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर ही विकसनशील शहरे आहेत. यात नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहे. दोन्ही शहरात स्थलांतराचे प्रमाण वाढत आहे, शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात जर दोन्ही नगरपालिकांची मिळून एक महानगरपालिका झाली, तर ती क वर्ग महानगरपालिका होईल. तसेच तिथे आयएएस दर्जाच्या आयुक्तांची नियुक्ती होईल. शहराच्या विकासाठी अधित निधी मिळेल, असे वक्तव्य शिवसेनेचे अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केले.
सुनील चौधरी यांच्या वक्तव्यावर बदलापूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार किसन कथोरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, महानगरपालिका नक्की होईल, पण ती एकट्या बदलापूर शहराची होईल. जनगणना झाल्यास लोकसंख्येचे आकडे समोर येतील. आमची लोकसंख्या इतकी आहे की इतरांची आम्हाला गरजच भासणार नाही.
अंबरनाथमध्ये शिवसेना वरचढ आहे. तर बदलापूरमध्ये शिवसेना आणि भाजपामध्ये 'काटे की टक्कर' असल्याचे म्हटले जात आहे. बदलापूरची स्वतंत्र महानगरपालिका तयार करुन त्यावर भाजपाचा पहिला महापौर बसवण्याचा किसन कथोरेंचा मानस आहे. तर अंबरनाथ-बदलापूर एकत्र महानगरपालिका झाल्याने अंबरनाथमधील शिवसेनेच्या जागांमुळे भाजपाला महापौर बसवता येणआर नाही. त्यामुळे आम्हाला अंबरनाथ नको अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. दरम्यान याप्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय कौल देतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.