Maharashtra Politics: भाजपकडून मला संपवण्याचा प्रयत्न, त्यांना केवळ मीच दिसतोय; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
भाजपकडून मला संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांना केवळ मीच दिसतोय. दुसरं कुणीही दिसत नाही, असा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मला संपवून देशासमोरील प्रश्न संपणार आहेत का? असा सवालही ठाकरे यांनी विचारला आहे. ते सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी १३ मे रोजी मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी (Sanjay Raut) उद्धव ठाकरेंची रोखठोक मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी ठाकरेंना अनेक प्रश्न विचारले.
भाजपकडून मला संपवण्याचा प्रयत्न : उद्धव ठाकरे
'सामना'ला दिलेल्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी भाजपला चांगलंच घेरलं. "मोदी-शहांसाठी जणू काही सगळे देशातील सर्व प्रश्न संपले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हा एकच प्रश्न देशासमोर आहे. मोदी शहा महाराष्ट्राच्या वाऱ्या करीत आहेत, हे काहीतरी आक्रितच आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"उद्धव ठाकरेंना संपवून काश्मीर शांत होणार आहे का? चीन आपली घुसखोरी थांबवणार आहे का? मणिपूरच्या महिलांची लुटलेली इज्जत परत मिळणार आहे का?" असा तिखट सवाल उद्धव ठाकरेंनी मोदी-शहांना केला.
"तुम्ही तर पंतप्रधान आहात तरी कश्मीरमधले पंडित घरी जाऊ शकत नाहीयेत. काश्मीरमध्ये हल्ले तुम्ही थांबवू शकत नाहीत. मणिपूर अशांत होऊन आज जवळपास वर्ष झालं, अजूनही मोदी तिकडे जात नाहीत. मोदी मणिपूरबद्दल काही बोलत नाही", अशी टीकाही ठाकरे यांनी केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.