राज्यपालांना आता कोल्हापूरचा जोडा दाखवण्याची गरज; उद्धव ठाकरे काय म्हणाले वाचा...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांच्या विधानाचा कडक शब्दात समाचार घेतला.
Uddhav Thackeray vs Bhagat Singh Koshyari
Uddhav Thackeray vs Bhagat Singh KoshyariSaam TV

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईबाबत एक वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांच्या विधानाचा कडक शब्दात समाचार घेतला. राज्यपालांनी महाराष्ट्रातील चांगल्या गोष्टी त्यांनी पाहिल्या असतील. पण त्यांना आता कोल्हापूरचा जोडा दाखवण्याची गरज आहे. असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. (Uddhav Thackeray Latest News)

Uddhav Thackeray vs Bhagat Singh Koshyari
Devendra Fadnavis : राज्यपालांच्या वक्तव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, सहमत नाहीच

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारपरिषद घेतली. यामध्ये त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा चांगलाच समाचार घेतला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या तोडातील वक्तव्य कुणाच्या तरी पोटातून आलं आहे. राज्यात महापालिकेच्या निवडणुका आहेत. मतांच्या ध्रुवीकरणासाठीच त्यांनी हे विधान केलं आहे. हिंदुंमध्ये फूट पाडण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

त्याचबरोबर मराठी अमराठी असा वाद लावण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे कोश्यारी नावाचं हे पार्सल परत पाठवलं पाहिजे, असं सांगतानाच भगत सिंह कोश्यारी यांनी त्वरीत माफी मागायला हवी, अशी मागणी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच कोश्यारींना तुरुंगात पाठवणार की घरी पाठवणार? असा जाबही त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला विचारला आहे. (Shivsena Latest News)

Uddhav Thackeray vs Bhagat Singh Koshyari
या गोष्टी राज्यपालांकडून होत असतील तर लोकांनी लोकशाहीवर विश्वास कसा ठेवायचा - शरद पवार

कोश्यारींना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ

मुंबईवर केलेल्या विधानावरून उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना चांगलंच सुनावलं आहे. महाराष्ट्रात मंदिरं आहेत. तळे आहेत. डोंगर आहेत. गड किल्ले आहेत. लेण्या आहेत. महाराष्ट्रातील चांगल्या गोष्टी त्यांनी पाहिल्या असतील. पण कोल्हापूरचा जोडा नाही बघितला. कोल्हापूरी वहाण आहे. तो जोडा त्यांना दाखवण्याची गरज आहे. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

कोल्हापुरातील कोल्हापुरी वहाण जगप्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ काय लावायचा तो लावा. मी त्यावर बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील कष्टकरी लोकांनी तो जोडा तयार केला आहे. कोल्हापुरी जोड्याचा उपयोग कसा करायचा? त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. घी देखा लेकीन कोल्हापुरी जोडा नही देखा असं जर असेल तर त्यांना कोल्हापुरी जोडे सुद्धा दाखवण्याची वेळ आली आहे, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. (Uddhav Thackeray Todays News)

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'कोश्यारी यांची भाषणे मुंबईतून लिहिली जातात की दिल्लीतून लिहून येतात हे माहीत नाही. हा छत्रपती शिवाजी महाराज आणि साधु संताची पावले लागलेला हा महाराष्ट्र आहे. मात्र, राज्यपालांना याची जाणीव नाही. ही मुंबई कोश्यारींनी आंदण दिलेली नाही. तर ही संयुक्त महाराष्ट्रातील लढ्यातून मिळालेली मुंबई आहे. मुंबईसाठी फक्त 105 हुतात्मे शहीद झाले नव्हते. रक्त सांडून मिळवलेली ही मुंबई आहे'.

कोश्यारींना घरी पाठवायचे की तुरुंगात?

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज मराठी माणसाचा अपमान केला असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. कोश्यारी यांनी मराठी माणसाच्या मनात त्यांनी आग लावली आहे. ते राष्ट्रपतीचे दूत असतात. जातपात धर्माच्या पलिकडे जाऊन सर्वांना समान वागणूक देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य मोडलं असेल तर त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा? दुसरा गुन्हा म्हणजे त्यांनी हिंदूत फूट पाडण्याचं काम केलं आहे. राज्यपालांनी फूट पाडण्याचं काम केलं आहे. हा त्यांचा अधिकार आहे का? कोश्यारींना आता घरी पाठवायचं की तुरुंगात याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com