शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना सत्ताधारी राजकारणात व्यक्त आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती चिंताजनक आहे. त्यात अकलेचाही दुष्काळ पडल्याने मार्ग निघणे अवघड झाले आहे, अशी टीका सामना अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर करण्यात आली आहे.
आज शेतकरी संकटात असताना त्यांच्या प्रश्नांवर प्रभावी तोड निघणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना तातडीचे अनुदान, पीक विमा, वीज बिल माफी यावर निर्णय होणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट आहेच. जनावरांच्या चारापाण्याबाबत सरकार काय उपाय करणार आहे? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. (Latest Marathi News)
अग्रलेखात खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी आतापर्यंत 700 कोटी खर्च झाले. त्यात पालिकेचा निधी देखील आहे. नगरविकास खात्याची उधळपट्टी आमदारांवर सुरूच आहे. ती थांबवून सर्व पैसा दुष्काळ निवारणासाठी, शेतकरी बांधवांचे प्राण वाचवण्यासाठी खर्चायला हवा, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात एकट्या ऑगस्टमध्ये 30 च्यावर आत्महत्या झाल्या. आता या मृतांवर कृषीमंत्री 'जेसीबी'ने फुले उधळणार आहेत काय? असा सवाल अग्रलेखात धनंजय मुंडे यांना विचारण्यात आला आहे.
राज्यातील धरणांमध्ये सरासरी 42 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत जाईल. नगरसारख्या जिल्ह्य़ात आताच दीड लाख लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. राज्यातील 358 पैकी 264 तालुक्यांत दुष्काळाचा वणवा आहे. अशाने शाळा बंद पडतील. लहान उद्योग थांबतील. गावांचे स्थलांतर होईल. मुंबई-पुण्यासारख्या शहरांवर लोंढे आदळतील. या गंभीर स्थितीतून मार्ग काढणारी इच्छाशक्ती आज राज्यकर्त्यांत दिसत नाही. मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांत जनतेला सामोरे जाण्याचे धाडस नाही, असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.