
पुणे : सोनवडी सुपे येथे १५ दिवसात तिसऱ्यांदा शॉर्ट सर्कीटने दोन शेतकऱ्यांचा अर्धा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. आज दुपारी १च्या दरम्यान ही घडली. येथे सलग तीन घटनांमुळे महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. येथील शेतकरी सतिश महादेव गोंडगे व दत्तात्रय मनोहर गोंडगे यांचा गट नंबर १७५ मध्ये अर्धा एकर ऊसाचे पाच ते सहा महिन्याचे पिक होते. या ऊसाच्या शेतावरुन शेती पंपासाठी वीजेच्या तारा गेलेल्या आहेत. आज रविवारी रोजी दुपारी १च्या दरम्यान वाऱ्याने या शेतातील तारांचा एकमेकांना स्पर्श झाला, आणि ठिणग्या ऊसाच्या शेतात पडल्या. या ठिणग्यामुळे ऊसाच्या पाचटाने पेट घेतला.
आग लागल्यानंतर गोंडगे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली, आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेगाने वारा असल्यामुळे आग आटोक्यात येऊ शकली नाही. या आगीत अंदाजे गोंडगे यांचे ५० हजार रुपयांचं नुकसान झालं आहे. शेतकरी गोंडगे यांचा ऊस १५ ते १६ कांड्यावर आला होता. त्यांनी तो ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी ठेवला होता. पाणी टंचाईच्या काळात जपलेला ऊस काही वेळात डोळ्यासमोर जळून खाक झाला. त्यामुळे गोंडगे यांना मानसिक आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.
सोनवडी सुपे हद्दीत १५ दिवसांत तिसऱ्यांदा वीजेच्या शॉर्ट सर्कीटने आग लागून ऊस जळाल्याच्या घटना घडल्या आहेत. अगोदरच्या दोन घटनेत देखील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालं आहे. मात्र, महावितरण कंपनीनं अद्यापही पावसाळा पूर्वी देखभाल दुरुस्तीचं कामं केलेली नाहीत. त्यामुळे महावितरणच्या भोंगळ कारभाराची चर्चा चव्हाट्यावर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.