प्राची कुलकर्णी -
पुणे : काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड यांच्यासह रोहित टिळक यांनी राजीनामा दिल्याची माहिती समार येत आहे. काही दिवसांपुर्वी शिर्डी येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेमध्ये दोन पदांवर असलेले विविध पदाधिकारी एका पदाचा राजीनामा देणार, राज्यभरात 'एक व्यक्ती एक पद' ही संकल्पना राबवणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली होती. त्या संकल्पनेनुसार आता काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाल्याचं पाहायला मिळतं आहे.
शिर्डीतील संकल्पानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशच्या अधिवेशनात ५१ जणांनी तात्काळ राजीनामे दिले होते. त्यामध्ये रमेश बागवे (Ramesh Bagwe) ऍड. अभय छाजेड आणि रोहित टिळक यांचाही समावेश आहे.तसंच मागील ५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून एका पदावरती कार्यरत असल्याने त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे प्रदेश कॉंग्रेसकडे (Congress) दिले आहेत. तसंच रमेश बागवे यांच्या राजीनाम्यामुळे नवीन शहराध्यक्षपदाच्या नियुक्तीसाठी पुणे (Pune) शहर कॉंग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.
हे देखील पाहा -
दरम्यान, माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'एक व्यक्ती एक पद' या संकल्पनेवर वक्तव्य केलं. ते म्हणाले, 'राज्यात पाच वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर असलेल्या ५१ जणांचा राजीनामा झाला. मात्र, आता आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका आहे. त्यामुळे या काळात नवीन अध्यक्ष नेमायचा का? की निवडणुकीपर्यंत त्यांना कायम ठेवावं? याबाबत हायकमांडशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले.
तसंच केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. रुपया पडला, महागाई वाढली शेतकऱ्यांना बरबाद केलं. अपयश झाकण्यासाठी गांधी परिवाराला टार्गेट केलं जातंय. देशातला काँग्रेस कार्यकर्ते समर्थ आहेत. गांधी परिवाराला हात लावला, तर देशभरात जेलभरो आंदोलन करु त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होईल असा इशारा देखील त्यांनी भाजपला दिला आहे.
दरम्यान, 'एक कुटुंब एक पद' या धोरणानुसार आता नागपूर (Nagpur) काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी देखील राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारू नये, यासाठी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तसंच काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागपूरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन विकास ठाकरे यांनाच शहराध्यक्ष म्हणून कायम ठेवावं अशी मागणी केली आहे. (Nagpur Congress city president Vikas Thackeray)
विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरात काँग्रेसनं चांगलं काम केलं, त्यांच्यामुळे काँग्रेसला नागपूरात बळ मिळालं, अशा भावना काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्यांकडे व्यक्त केल्या आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार महापालिका निवडणुकापर्यंत विकास ठाकरे यांच्याकडे अध्यक्षपद कायम ठेवणार असल्याचं समजतं आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.