
सचिन जाधव, पुणे
Pune Tourist list Pahalgam attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या एका गटानं बेछूट गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांनी प्राण गमावले असल्याची माहिती हाती आली आहे. त्यात डोंबिवलीतील तीन, तर पुण्यातील दोन जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून शेकडो पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेले होते. पुण्यातील २६४ जणांच्या नावांची यादी सामच्या हाती लागली आहे. यातील जवळपास १५० पर्यटक तिथे अडकले आहेत.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सातत्याने तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जे पर्यटक अडकले आहेत, त्यांना आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. श्रीनगर ते दिल्ली विशेष विमानाने त्यांना आणण्यात येईल.
पुण्यातील पर्यटक अडकले
पुण्यातील शेकडो पर्यटक जम्मू काश्मीरला फिरण्यासाठी गेले आहेत. त्यातील जवळपास दीडशे पर्यटक अडकल्याची माहितीही मोहोळ यांनी दिली. त्यांना पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज नाही शक्य झालं तर, उद्या त्यांना सर्वांना आणू, असंही त्यांनी सांगितलं. श्रीनगर जिल्हाधिकाऱ्यांसोबत सातत्याने दूरध्वनीवरून मी माहिती घेत आहे. गृह विभाग अधिकारी जे महाराष्ट्रातले आहेत, ते मदत करण्याचं काम करत आहेत. पुण्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनीही माझ्याकडून माहिती घेतली आहे. त्यासाठी मदत करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पुण्यासाठी नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक 9370960061 / 02026123371 असून, नातेवाइकांनी काळजी करू नये. आम्ही सगळे सोबत आहोत, असेही ते म्हणाले.
अजित पवार यांनी घेतला आढावा
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे पार्थिव पुण्यात आणण्यात येणार आहेत. पुण्यातील आणखी काही पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकले आहेत. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पुण्यातील सर्व पर्यटकांची माहिती पवार यांनी घेतली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या रुपाली ठोंबरे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडूनही माहिती घेण्यात येत आहे.
दौंड, हवेली, इंदापूरचे पर्यटकही अडकले
पहलगामपासून जवळच असलेल्या पर्यटनस्थळी दौंड, हवेली आणि इंदापूर तालुक्यातील काही नागरिक अडकले आहेत. ते सर्व सुखरुप आहेत. काही नागरिकांशी दौडचे आमदार राहुल कुल यांनी संपर्क साधला. त्यांना सुखरुप घरी परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. त्याबाबत त्यांच्या कार्यालयाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालाकडून देखील प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.