मुंबईच्या सातही धरणांतील पाणीसाठा ८९.०८ टक्क्यांवर
मोडक सागर आणि विहार तलाव १०० टक्के भरले
दमदार पावसामुळे मुंबईतील १० टक्के पाणीकपात लवकरच हटवली जाण्याची शक्यता
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या या धरणांमध्ये एकूण ८९.०८ टक्के इतका वापरण्यायोग्य पाणीसाठा उपलब्ध झाला असून, त्यामुळे मुंबईकरांवर लागू असलेली १० टक्के पाणीकपात लवकरच मागे घेतली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जलअभियंता विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, रविवार (२ ऑगस्ट) सकाळी ६ वाजेपर्यंत धरणांतील पाणीसाठ्यात केवळ २४ तासांत ०.६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईच्या सात जलाशयांची एकूण साठवण क्षमता १४,४७,३६३ दशलक्ष लिटर (एमएल) असून, त्यापैकी सध्या १२,८९,२८९ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा ८८.९४ टक्के होता.
सात तलावांपैकी मोडक सागर आणि विहार हे दोन्ही तलाव शंभर टक्के भरले आहेत. तानसा तलाव ९९.५८ टक्के, तर तुळशी तलाव ९९.४६ टक्के भरला आहे. मध्य वैतरणा धरणात ९१.६५ टक्के, भातसा धरणात ८७.१४ टक्के आणि अप्पर वैतरणा धरणात ७८.३९ टक्के पाणीसाठा नोंदवला गेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी पाऊस झाल्यास एकूण पाणीसाठा ९० टक्क्यांचा टप्पा सहज ओलांडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत अप्पर वैतरणा परिसरात सर्वाधिक ११२ मिमी पावसाची नोंद झाली. मध्य वैतरणा, मोडक सागर, भातसा, तानसा आणि तुळशी परिसरातही समाधानकारखा पाऊस झाला. या सातत्यपूर्ण पावसामुळे मुंबईच्या पाणीस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असून, नागरिकांना पाणीकपातीपासून लवकरच दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.