मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 7.53 टक्के पाणीसाठा
अप्पर वैतरणा धरणाचा साठा शून्यावर पोहोचला
उशिरा आलेल्या मान्सूनमुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम
महापालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे
राज्यात मान्सून सध्या सर्वदूर पसरला असून काही जिल्ह्यांमध्ये गेल्या १-२ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईत २४ जून नंतर पावसाने दांडी मारली. एकीकडे उशिरा आलेल्या मान्सूनमुळे आणि अल निनोच्या प्रभावामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले. तर दुसरीकडे पाणी टंचाईच भीषण संकट मुंबईसह अनेक ठिकाणी ओढवलं आहे. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला असून जून महिना संपत आला तरी अपेक्षित पावसाअभावी परिस्थिती गंभीर बनली आहे. महापालिकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये मिळून केवळ 7.53 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची परिस्थिती अधिकच गंभीर असल्याचे दिसून येत आहे. 2025 मध्ये याच दिवशी धरणांमध्ये 35.97 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, तर 2024 मध्ये तो 5.28 टक्के होता. यंदा मान्सूनच्या संथ सुरुवातीमुळे धरणांमध्ये अपेक्षित प्रमाणात पाण्याची आवक झालेली नाही. विशेषतः भातसा, तानसा आणि मध्य वैतरणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. भातसा धरण परिसरात 88 मिमी, तानसा येथे 98 मिमी तर मध्य वैतरणा परिसरात केवळ 71 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या तिन्ही धरण क्षेत्रांमध्ये अद्याप 100 मिमी पावसाचाही टप्पा ओलांडलेला नाही. गेल्या 24 तासांतही या भागात केवळ 2 ते 8 मिमी एवढाच किरकोळ पाऊस झाला.
अप्पर वैतरणा धरण क्षेत्रात आतापर्यंत 376 मिमी पाऊस झाला असला तरी धरणाची पाणीपातळी नीचांकी स्तराखाली गेल्याने तेथील उपयुक्त साठा शून्य दाखवण्यात आला आहे. सध्या या धरणातून आपत्कालीन स्वरूपात पाण्याचा उपसा सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, मुंबईच्या अंतर्गत भागातील विहार आणि तुळशी तलाव परिसरात तुलनेने चांगला पाऊस झाला असून त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, एकूण परिस्थिती पाहता मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर दबाव कायम आहे.
मुंबईला दररोज सुमारे 3,900 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. उपलब्ध साठा लक्षात घेता हा साठा मर्यादित कालावधीसाठीच पुरेसा ठरू शकतो. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरी तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.