

मयुर राणे, साम प्रतिनिधी
मुंबईत पुन्हा एकदा मराठी-गुजराती वाद उफाळून आला आहे. कधी सोसायटीमध्ये घर देण्यावरून तर कधी जेवणाच्या कारणावरून मराठी आणि गुजराती वाद झाले आरहेत. आता घाटकोपरमध्ये सार्वजनिक शौचालय वापरला म्हणून गुजराती व्यवसायिकांनी मराठी व्यावसायिकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातच मराठी माणसाला मारहाण केली जात होती.
घाटकोपर पूर्वमध्ये हा मराठी-गुजराती वाद समोर आला आहे. मराठी माणसाला सार्वजनिक शौचालय वापरू देत नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरून गुजराती व्यावसायिकांनी मराठी व्यवसायिकाला आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. घाटकोपर पूर्व येथे रेल्वे स्थानकाच्या लगत नालंदा सोसायटी आहे. यात मुंबई मनपाच्या बाजार विभागाचे प्रकल्प धारकांची कार्यालय आहे. यात दुसऱ्या मजल्यावर अक्षय भांगरे यांचे प्रतिक्षा एजन्सी चे कार्यालय आहे.
सोसायटीमध्ये मराठी व्यक्तींना घरं देण्यासह गुजराती व्यक्ती विरोध करतात. आता तर गुजराती व्यावसायिकाने द्वेष करण्याची हद्दच पार केली. त्याने चक्क सार्वजनिक शौचालय वापरण्यावरून मराठी व्यक्तीशी वाद घातलाय. गेल्या दीड वर्षापासून भाड्याच्या कार्यालयात ते आहेत. त्यांना इथे काम करता येऊ नये म्हणून बाजूलाच असलेली गुजराती व्यावसायिक झिन गडा आणि निखिल डोमाडीया वारंवार त्यांना त्रास देत असल्याचा आरोप मराठी व्यावसायिकाने केला आहे. एवढेच काय तर त्यांनी येथे असलेले सार्वजनिक शौचालय त्यांनी वापरले म्हणून त्यांना मारहाण केली, आपण मराठी असल्याने ते मराठी माणसानी वापरल्याने ही मारहाण झाल्याचा आरोप अक्षय यांनी केला आहे.
यात आता पालिका प्रशासनाला पैसे देऊन हे कार्यालय रिकामे करण्यासाठी नोटीस लावण्यात आले. पोलिसांकडे मारहाणीची तक्रार केल्यांवर त्यांनी फक्त एनसी घेतल्याचा आरोप अक्षय यांचा आहे. यामुळे मनसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी गडा यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तसेच कार्यालय बंद असल्याने त्या बाहेर मुंबईत फक्त मराठी असा इशारा दिला आहे.
याआधी घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबाकडून मारहाण झाली होती. घाटकोपरच्या रायगड चौक परिसरात ही घटना घडली होती. शेजारी शेजारी राहणाऱ्या मराठी आणि गुजराती कुटुंबामध्ये जोरदार राडा झाला होता. विशेष म्हणजे मराठी कुटुंबाच्या घरात घुसून मारहाण केली होती. घरात कुत्रा पाळावा की नाही या कारणावरून या दोन्ही कुंटुंबियांमध्ये वाद झाला होता.