
पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा परिसरात रविवारी (१५ जून) दुपारी भीषण दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवर बांधलेला पूल अचानक कोसळला. पूल ओलांडत असलेले २० ते २५ जण नदीत वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे.
आमदार सुनील शेळके नेमकं काय म्हणाले?
कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवर असलेला पूल कोसळला. या दुर्घटनेबाबतची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या दुर्घटनेमध्ये ६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. एनडीआरएफची टीम, पोलीस आणि तळगाव नगरपरिषदेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्याला सुरुवात झाली आहे, असे आमदार शेळके यांनी सांगितले. या ठिकाणी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यादरम्यान सुनील शेळके घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कुंडमळा परिसरात दररोज अनेक पर्यटक भेट देतात. रविवारीदेखील काही पर्यटक नदी ओलांडण्यासाठी पुलावरून जात होते. त्याच वेळी पूल कोसळला आणि अनेकजण थेट नदीच्या प्रवाहात फेकले गेले. काही पर्यटकांचे शोधकार्य सुरू असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
लोखंडी पूल कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने बचाव कार्य सुरु केले. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. स्थानिकांसह आपत्कालीन यंत्रणा वाहून गेलेल्यांचा शोध घेत आहेत. लोखंडी पूलावर जास्त ताण आल्याने पूल खाली कोसळला असा अंदाज वर्तवला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.