किरीट सोमय्यांच्या वादग्रस्त ट्विटमुळे शिंदे-भाजप सरकारमधील मतभेद उघड

भाजपनेते किरीट सोमय्या यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी एक ट्विट केलं आहे.
BJP-Shinde Goverment
BJP-Shinde GovermentSaam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई: भाजपनेते किरीट सोमय्या यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी एक ट्विट केलं, या ट्विटमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना माफिया म्हटलं आहे. सोमय्यांच्या या ट्विटमुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोमय्यांनी (Kirit-somaiya) केलेल्या वादग्रस्त ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'आज 'रिक्षावाला' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्र्यांना हटविल्याबद्दल अभिनंदन केले.'

दरम्यान, सोमय्यांच्या या ट्विटमुळे शिंदेगट आणि भाजप यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. कारण, भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली असली तरीही आजही सेनेचे बंडखोर आमदार आमचे नेते हे उद्धव ठाकरे असून आपण शिवसैनिक असल्याचा दावा करतात. त्यामुळे एकीकडे ठाकरेंना आपले नेते म्हणायचं आणि सहकारी पक्षातील नेत्यांनी त्यांना माफिया म्हणणं मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या गटातील आमदारांना मान्य आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे.

ट्विट चुकीचं - केसरकर

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्त आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी साम टीव्हीशी बोलताना आमच्या नेत्यांवर केलेले आरोप सहन करणार नसल्याचं म्हटलं आहे. केसरकर म्हणाले, 'माफिया म्हणणं चुकीचं आहे, असे आरोप आम्ही सहन करणार नाही. तसंच हा प्रकार अतिशय चुकीचा आहे.

आमची आणि भाजपच्या सर्व आमदारांची एकत्रीत भेट झाली त्यावेळी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांसमोर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आपल्या भाषणामध्ये आपल्या पक्षातील माननीय व्यक्तींबद्दल कोणीही कॉमेंट करु नये, असं सांगितलं होतं. शिवाय आता आपण बाहेर असून मागे आल्यानंतर फडणवीस यांना असे आरोप करणं चुकीचं असून अशी वक्तव्य केली जाऊ नयेत याबाबत आपण फडणवीसांना जाब विचारणार असल्याचं ते म्हणाले.

होय ती माफियागिरीच - सोमय्या

तर दुसरीकडे भाजपनेते किरीट सोमय्या हे मात्र आपल्या भूमीकेवर ठाम आहेत. साम टिव्हीशी बोलताना सोमय्या यांना आपली या ट्विट करण्यामागे काय नेमकी भावना काय आहे. असं विचारलं असता ते म्हणाले, 'भावना अगदी स्पष्ट आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत (Sanjay Raut) माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी आमच्याशी माफियागिरी केली होती. ठाकरे सरकारमध्ये राऊत, पांडे यांना कायद्याचा दुरुपयोग केला. मनसुख हिरेन यांची हत्या केली अशी अनेक कामे सुपारी देऊन केली आहेत त्यामुळे ती माफियागिरीचं होती. असं सोमय्या म्हणाले.

दरम्यान, यावेळी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे म्हणाले, भाजप हे एकनाथ शिंदे यांच्या गटाचा फक्त वापर करणार आहे. शिंदे यांना मुख्यमंत्री केलं तेव्हाच हे सरकार अस्थिर झालं असल्याचं सावंत म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com