

मयुरेश कडव, बदलापूर, साम टीव्ही
जून महिन्यात रखडलेला पाऊस जुलैच्या पहिल्याच आठवड्यात धुमाकूळ घालत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस मुंबईसह पालघर, रायगड आणि आसपासच्या जिल्ह्यांत अविश्रांत कोसळतोय. काल रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला असून, रायगडच्या कर्जत तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.मुसळधार पावसामुळं उल्हास नदीला पूर आला आहे. नेरळजवळील रस्ता पाण्याखाली गेला आहे.
दामदहून नेरळकडे जाणारा आणि उल्हास नदीला लागून असलेला रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे दामद गावाहून नेरळचा साईमंदिराकडे जाणारा रस्ता आणि त्या मार्गे दहिवली, कोदिवले, बिरदोले, अवसरे, वरई ते पोशीर आणि कळंब, वारेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. उल्हास नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. चालकांनी वाहत्या पाण्यातून वाहने घेऊन जाण्याचे धाडस करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी बदलापूर आणि वांगणी दरम्यान असलेल्या राज्यमार्गावर आले आहे. त्यामुळे राज्य मार्गावरची वाहतूक ठप्प झालीय. हा कल्याण- कर्जत राज्यमार्ग असून दररोज शेकडो वाहने ये-जा करत असतात. उल्हास नदी ओसंडून वाहत असल्याने कासगावजवळ हा राज्यमार्ग पाण्याखाली गेला आहे. काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली होती.
रायगडच्या कर्जत तालुक्यातील आंबिवली गावाजवळ ३० ते ३५ वर्षे जुना बंधारा फुटला. सकाळी बंधारा फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला. भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून एका बंगला प्रकल्पातील घर पाण्याखाली गेले आहे. मोगराज, रजपे आणि जांबरुंग परिसरातील अनेक गावांचा रस्तेमार्गाने संपर्क तुटला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.