संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण: मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेलेला कल्याणचा २८ वर्षीय तरुण अभिषेक घोणे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक नागरिक बेपत्ता झाल्याचे सांगितले जात असून, त्यामध्ये कल्याण-डोंबिवलीतील चार नागरिकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. अभिषेक घोणे हा मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेला होता. मात्र गेल्या तीन दिवसांपासून त्याचा कुटुंबीयांशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे घोणे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अभिषेक सुखरूप असावा यासाठी कुटुंबीय त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अभिषेकचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्याबाबतची माहिती कुटुंबीयांना द्यावी, अशी मागणी घोणे कुटुंबीयांनी शासनाकडे केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तसेच संबंधित यंत्रणांनी तातडीने मदतकार्य करून बेपत्ता नागरिकांचा शोध घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
यावेळी अभिषेकचे वडील सुरेश घोणे यांनी 'साम टीव्ही'शी संवाद साधत सरकारकडे विनंती केली आहे. अभिषेक २४ तारखेला काठमांडूला गेला होता. तेथून सम्राट टुर्सच्या माध्यमातून तो मानसरोवर यात्रेसाठी रवाना झाला आणि तेथील बुद्ध गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामाला थांबला. रात्री साडेदहा वाजता त्याने फोन करून कुटुंबाशी संवाद साधला आणि तिथले फोटोही पाठवले. बोलणे झाल्यानंतर तो झोपायला गेला, मात्र बुधवारनंतर त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही.
कुटुंबाने त्याची सर्व माहिती शासनाच्या वेबसाइटवर नोंदवली आहे, परंतु तेथून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. याप्रकरणी कल्याण बाजार पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवण्यात आली आहे. शासनाने आमच्या मुलाचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी भावनिक विनंती अभिषेकच्या वडिलांनी सरकारकडे केली आहे. ही विनंती करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते आणि संपूर्ण कुटुंबालाही रडू कोसळले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.