Nepal Floods: नेपाळमध्ये महाप्रलय! महापुरानंतर भूकंपाचे धक्के, मृतांचा आकडा ४०० वर; २९० भारतीय बेपत्ता

Nepal Flood Update: नेपाळमध्ये महापुराने हाहाकार केला असून पूरानंतर भूकंपाचे धक्के बसले. नेपाळमधील मृतांचा आकडा ४०० जवळ पोहचला आहे.
Nepal Floods: नेपाळमध्ये महाप्रलय! महापुरानंतर भूकंपाचे धक्के, मृतांचा आकडा ४०० वर; २९० भारतीय बेपत्ता
Nepal Flood Updatesaam tv
Published On
  • नेपाळमध्ये महापुराने हाहाकार केला आहे

  • नेपाळमध्ये महापुरानंतर भूकंपाचे धक्के

  • महापुरात २९० भारतीय बेपत्ता

  • नेपाळ महापुरातील मृतांचा आकडा ३९२ वर

  • नेपाळ पूर संकटात बेपत्ता भारतीयांचा शोध सुरू

नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुराने मोठं नुकसान झालं आहे. या महाप्रलयामुळे नेपाळ संकटात आहेत. महापुरानंतर नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के बसले त्यामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. नेपाळ-तिबेट सीमेवर हिमनदी फुटल्यामुळे आणि हिमस्खलनामुळे आलेल्या विनाशकारी पुरामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. या महापूरातील मृतांचा आकडा ३९२ वर पोहोचला आहे. यापैकी ३८९ जणांचा मृत्यू एकट्या नेपाळमधील नागरिकांचा झाला आहे. तर इतर तिघांचा मृत्यू तिबेट सीमेवरील नागरिकांचा झाला आहे. या महापुरामध्ये १,४६८ जण अद्याप बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये गेलेले २९० भारतीय बेपत्ता आहेत.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, नेपाळमधील २९० भारतीय नागरिकांशी सध्या संपर्क होऊ शकत नाही आणि त्यांना शोधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवरील शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. भोटे कोसी नदीला महापूर आला आसून नदीकाठी असणारी अनेक गावं वाहून गेली आहेत. अनेक घरं, इमारती वाहून गेल्या आहेत. नेपाळमधील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. भोटे कोसी नदीच्या प्रणालीच्या वरच्या भागात तयार झालेले एक नवीन संरक्षक सरोवर फुटण्याची शक्यता आहे.

नेपाळमध्ये २९० भारतीय बेपत्ता झाले आहेत. त्यांना शोधण्यासाठी भारत सरकारकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी काठमांडू आणि बीजिंग येथील भारतीय राजदूतांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि आपल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी भारताने एक २४-तास नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. नेपाळच्या मदतीसाठी भारताने हात पुढे केला आहे. आतापर्यंत भारताने भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानांमार्फत तंबू, औषधे, ब्लँकेट्स, सौर दिवे आणि अन्नधान्यासह आणि आपत्कालीन मदत साहित्य पाठवले आहे.

भारताने आतापर्यंत नेपाळमध्ये अडकलेल्या ८४ भारतीयांची सुटका केली आहे. यामध्ये त्रिशुली-१ जलविद्युत प्रकल्पात अडकलेल्या ६३ भारतीय कामगारांचा आणि तामिळनाडूतील २१ लोकांचा समावेश आहे. याशिवाय नेपाळ लष्कराने रसुवा येथे अडकलेल्या ११ भारतीय पर्यटकांना विमानाने काठमांडूला आणले आहे. इतर भारतीयांचा देखील शोध घेतला जात आहे. त्यांना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मध्य नेपाळमधील रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांमध्ये पुरामुळे संपूर्ण पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक गावे आणि सरकारी इमारती, घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. चितवन जिल्ह्यातून सर्वाधिक १३७ मृतदेह सापडले आहेत. बेपत्ता असलेल्यांमध्ये नेपाळी सैन्य, पोलिस आणि सशस्त्र दलांमधील ८० हून अधिक जवान आणि जलविद्युत प्रकल्पांमधील १६० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com