संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसरातील स्मशानभूमीच्या पुनर्बांधणीचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले असून कामाची मुदत संपूनही अद्याप कोणतीही प्रगती झालेली नाही. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी मनसे कार्यकर्ते कपिल पवार यांनी महापालिकेकडे केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बैल बाजार येथील जुनी स्मशानभूमी तोडून आधुनिक पद्धतीने पुनर्बांधणी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. सदर कामाची मुदत ३०० दिवसांची असतानाही आजतागायत काम पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे, आतापर्यंत केवळ जुनी स्मशानभूमी पाडण्यात आली असून नवीन बांधकामाचे कोणतेही काम प्रत्यक्षात सुरू झालेले दिसून येत नाही.
याच कालावधीत लालचौकी आणि बैल बाजार येथील मुख्य स्मशानभूमीचे काम एकाच वेळी सुरू करण्यात आल्याने कल्याण पश्चिम विभागातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अंत्यसंस्कारांसाठी पर्यायी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकरणास संबंधित ठेकेदार व महापालिकेचे अधिकारी जबाबदार असून, मुदत संपूनही काम पूर्ण न झाल्यामुळे ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच कामावर योग्य देखरेख न केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, अशी मागणी मनसे कडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जर तात्काळ योग्य कारवाई करण्यात आली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला असून त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व ठेकेदारावर राहील, असा इशारा मनसे ने दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.