कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांवरून मोठा वाद उफाळला
८० जणांना कुत्र्यांचा चावा
रहिवाशांचा प्राणी मित्रांवर खंडणीचा आरोप
दोन्ही बाजूंवर पोलिसांत गुन्हे दाखल
परिसरात तणावपूर्ण वातावरण
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
राज्यात गेले काही दिवस भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना सळो की पळो करून सोडलं आहे. अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत. अशातच आता कल्याण शहरातील उच्चभ्रू वाधवा मेडोज सोसायटीत भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून प्राणी मित्र आणि रहिवासी यांच्यातील वाद चिघळला आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंविरुद्ध खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटी परिसरात वारंवार भटक्या कुत्र्यांचा त्रास होत असून आतापर्यंत सुमारे ८० जणांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. यात लहान मुलांची संख्या अधिक असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काही रहिवाशांनी दोन प्राणी मित्रांची मदत मागितली होती.
मात्र, कुत्र्यांना अन्यत्र हलवण्यासाठी या प्राणी मित्रांनी दरमहा १६ हजार रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप रहिवाशांनी केला. यावरून खडकपाडा पोलिसांनी हिर राजपूत आणि रत्ना पुरोहित या प्राणी मित्रांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या वादाला आणखी कलाटणी देणारी घटना समोर आली आहे.
सोसायटी परिसरातील एका भटक्या कुत्र्याला मारल्याचा आरोप प्राणी मित्रांनी केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात रहिवाशाविरोधात प्राण्याला ठार मारल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या दुहेरी गुन्हे नोंदविण्याच्या घटनेमुळे प्राणी मित्र आणि रहिवासी यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.