

कल्याणमध्ये विकासकाकडून खंडणी उकळल्याचा प्रकार
पोलिसांत पती-पत्नीसह तिघांविरोधात गुन्हा
कारवाईमुळे कल्याणमधील योजनेशी संबंधित वर्तुळात खळबळ
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याणमधील क्लस्टर पुनर्विकास योजनेच्या कामात अडथळे निर्माण करण्याची आणि आंदोलन-उपोषणाची धमकी देत विकासकाकडून लाखो रुपयांची खंडणी उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी पती-पत्नीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे क्लस्टर योजनेशी संबंधित वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कल्याण पूर्व परिसरातील क्लस्टर योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पाच्या विकासकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कोळसेवाडी पोलिसांनी समाजसेविका आशा रसाळ, त्यांचे पती ऋतुकांचन रसाळ आणि नितीन मोकल यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे.
राज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या तक्रारीनुसार, कोळसेवाडी परिसरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पाविरोधात आंदोलन आणि उपोषण करण्याची धमकी देण्यात आली होती. हे आंदोलन मागे घेण्यासाठी सुरुवातीला तब्बल एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर झालेल्या चर्चेत ही रक्कम सात लाख रुपयांवर ठरवण्यात आली.
तक्रारीनुसार, सात लाख रुपये रोख स्वरूपात घेतल्यानंतर आणखी एक लाख पंचावन्न हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने उकळण्यात आले. तसेच क्लस्टर योजनेच्या कामासाठी ५० लाख रुपये आणि तीन फ्लॅट्सची मागणी करण्यात आल्याचाही आरोप विकासकाने केला आहे.
या तिघांनी ब्लॅकमेलिंग करून विकासकाकडून लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या तक्रारीची चौकशी पूर्ण केल्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करत आहे. या तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.