
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा प्रवास येत्या काळामध्ये आणखी सुपरफास्ट होणार आहे. यामागचे कारण म्हणजे मुंबईसह काही राज्यांना तब्बल १०० अमृत भारत ट्रेन मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे आणि प्रवास आरामदायी आणि वेगवान होणार आहे.
देशभरातील विविध मार्गांवर १०० अमृत भारत ट्रेन चालवण्याची मोठी योजना रेल्वे प्रशासनाकडून आखली जात आहे. दिल्ली-बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह अनेक शहरांसाठी थेट अमृत भारत गाड्या ताशी १३० किलोमीटर वेगाने धावणार आहेत. राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत ट्रेनच्या वेगामध्ये स्पर्धा करणाऱ्या या अमृत भारत ट्रेनचे भाडे मात्र खूपच कमी असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना या ट्रेनने प्रवास करणं खिशाला परवडणारे असणार आहे.
प्रवाशांच्या सोयी आणि गरजा लक्षात घेऊन भारतीय रेल्वे अमृत भारत ट्रेनची संख्या वाढवत आहे. या ट्रेनमुळे भविष्यात दरवर्षी १३ कोटींहून अधिक प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर वेळेवर पोहोचवता येणार आहे. अमृत भारत ट्रेन हायटेक सुविधांनी सुसज्ज केल्या जात आहेत. महत्वाचे म्हणजे अमृत भारत ट्रेन या वंदे भारत ट्रेनशी स्पर्धा करत आहे. अमृत भारत ट्रेनमध्ये फक्त सामान्य आणि स्लीपर क्लासचे कोच बसवले जात आहेत. प्रत्येक ट्रेनमध्ये २४ कोच बसवले जाणार आहेत.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २०२५-२६ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात रेल्वेला २,५२,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांना चालना देण्यासोबतच, प्रवाशांना व्यापक प्रमाणात सुविधा मिळावी म्हणून सामान्य रेल्वे प्रवाशांसाठी १०० अमृत भारत ट्रेन चालवण्याचाही अर्थसंकल्पात प्रस्ताव आहे. देशभरातील विविध मार्गांवर अमृत भारत ट्रेन चालवता याव्यात यासाठी २४ सामान्य स्लीपर कोच तयार केले जात आहेत. या ट्रेनच्या निर्मितीसाठी रेल्वेने २१,६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एवढ्या मोठ्या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे येत्या काळात रेल्वे क्षेत्रात मोठा बदल दिसून येणार आहे.
अमृत भारत ट्रेनमध्ये १३ ते १४ स्लीपर कोच आणि सुमारे १० जनरल कोच जोडण्याची योजना आहे. एका अमृत भारत ट्रेनमधून जवळपास ३६०० प्रवासी प्रवास करू शकतील. २४ कोच असलेल्या १०० अमृत भारत ट्रेनमधून दररोज ३,६०,००० प्रवासी प्रवास करू शकतील. यानुसार एका वर्षात सुमारे १३ कोटी प्रवासी प्रवास करू शकतील. यातून रेल्वेला मोठा फायदाही होईल आणि महसूल देखील मिळेल.
गर्दीच्या काळात म्हणजेच सणासुदीच्या काळात तिकिटांसाठी होणाऱ्या गर्दीपासून रेल्वे आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. या अमृत भारत ट्रेनमध्ये, एसएलआर कोचमध्ये गार्ड लगेज आणि दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये पेंट्री कार देखील असतील ज्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान ताजे अन्न खायला मिळेल.
अमृत भारत ट्रेनची रचना देखील खूप खास आहे. अमृत भारत ट्रेन पुल-पुश टेक्नॉलॉजीने सुसज्ज असेल, भगव्या रंगाची ही ट्रेन ताशी १३० किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहेत. प्रवाशांना राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत एक्स्प्रेसप्रमाणेच प्रवासी या ट्रेमधून वेगाने प्रवास करू शकतील. अमृत भारत ट्रेनचे भाडे राजधानी आणि शताब्दीपेक्षा कमी असेल. एवढेच नाही तर सामान्य श्रेणीच्या कोचमध्ये पॅडेड सीट्स देखील बसवल्या आहेत.
या अमृत भारत ट्रेन दिल्ली-बिहार, दिल्ली-ओडिशा, दिल्ली-उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल-तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश-महाराष्ट्र, बिहार यासह अनेक प्रमुख औद्योगिक शहरांमधून धावतील. या जनरल-स्लीपर ट्रेन्स कामगार, मजूर आणि कामगारांना लक्षात घेऊन चालवल्या जातील. अमृत भारत ट्रेनमुळे मोठ्या संख्येने लोकांना चांगल्या सुविधा मिळतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.