
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. या उन्हाळ्यात पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही. कारण यंदा शहरात पाणीकपात करण्यात येणार नाही. पुणे शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल इतका खडकवासला साखळीत येणाऱ्या ४ धरणात पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
गतवर्षीपेक्षा यंदा खडकवासला धरण साखळीत दोन टक्क्यांनी पाणीसाठा अधिक आहे. खडकवासला धरण साखळीतील चार धरणांमध्ये ११.९१ टीएमसी इतका पाणीसाठा जमा आहे. पुण्याला खडकवासला प्रकल्पामधील वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर या चार धरणांतून पाण्याचा पुरवठा होतो. या सर्व धरणांमध्ये सध्या ४०.८३ टक्के पाणी उपलब्ध असल्यामुळे येत्या उन्हाळ्यात पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार नाही.
महत्वाचे म्हणजे, पुण्यावरील पाणी टंचाईचे संकट दूर झाले आहे. १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठी सध्या धरणामध्ये शिल्लक आहे. त्यामुळे शेती सिंचनासाठीही पुढील दोन महिने पाणी देण्यात येणार आहे. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठी शिल्लक असल्यामुळे सर्वांना पाणी दिले तरी देखील जवळपास १ अब्ज टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.
पुणे शहराला खडकवासला धरणामधून दररोज १ हजार ४६० दशलक्ष लिटर (एमएलडी) इतका पाणी पुरवठा केला जातो. खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये बुधवारी ११.९१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजे १५ जुलैपर्यंत पुढच्या ९८ दिवसांसाठी ४.९९ टीएमसी पाणी शहराला लागणार आहे. तेवढे पाणी खडकवासला प्रकल्पात आरक्षित ठेवण्यात आले आहे. खडकवासला प्रकल्पात यंदा जास्त पाणीसाठा असल्यामुळे पुणेकरांचे पाणी टेन्शन मिटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.