गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची ठाणे स्थानकात प्रचंड गर्दी झाली.
प्रवाशांनी सीट मिळावी म्हणून तब्बल २५ तास आधी स्थानकावर मुक्काम केला.
फलाटावर जत्रेसारखे दृश्य, कुटुंबासह प्रवाशांनी तिथेच बस्तान मांडले.
रेल्वे प्रशासन व आरपीएफकडून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची दरवर्षी प्रचंड गर्दी होते. कोकणवासीयांसाठी हा सण म्हणजे केवळ धार्मिक नव्हे तर कौटुंबिक उत्सव असतो. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातून हजारो गणेशभक्त गावी जाण्यासाठी रेल्वे, एसटी किंवा खासगी वाहनांचा आधार घेतात. यंदाही गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने ठाणे स्थानकात मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. दरवर्षी शासनातर्फे कोकणवासीयांसाठी अनेक विशेष गाड्या सोडल्या जातात. मात्र या गाड्यांचं बुकिंग सुरु होताच बंद झालेलं पाहायला मिळतं. त्यामुळे इतर प्रवाशांची गैरसोय होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.
ठाणे स्थानकातून दररोज कोकणकन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, कोकण विशेष एक्सप्रेस यांसारख्या गाड्या सुटतात. या गाड्यांमध्ये बसण्यासाठी हजारो प्रवाशांचा ओढा असतो. विशेषत: ज्यांची तिकीट कन्फर्म झालेली नाही तसेच जनरल डब्यात प्रवास करावा लागणाऱ्या प्रवाशांना आपल्या कुटुंबासह त्रासात लांबलचक प्रवास करावा लागतो. या गाड्यांमध्ये जागा मिळावी म्हणून काही प्रवाशांनी तब्बल २५ तास आधी स्थानकावर येऊन उपस्थित राहिले आहे. शनिवारी रात्रीच अनेकांनी ठाणे स्थानक गाठले, जेणेकरून रविवारी सुटणाऱ्या गाडीत त्यांना जागा मिळेल. मात्र एवढ्या प्रतीक्षेनंतरही सीटवर बसायला मिळावे म्हणून प्रवाशांची लगबग आज ठाणे स्टेशनवर बघायला मिळाली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने या गर्दीची जबाबदारी आरपीएफकडे सोपवली आहे. मात्र ही गर्दी इतकी प्रचंड प्रमाणात आहे की गाडी आल्यावर ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. रात्री पासून स्थानकात रांग लावून असलेले प्रवाशांनी स्थानकातच झोप काढली. गावी जाण्याचा उत्साह आणि सीट पकडण्यासाठी होणारी धडपड यावेळेस दिसून आली. परिणामी संपूर्ण फलाटावरच जत्रेसारखा माहोल निर्माण झाला.
यामुळे प्रवासाच्या तणावात आणखी वाढ झाली. एकीकडे लांबचा प्रवास, दुसरीकडे तुडुंब गर्दी, त्यात रांगेच्या नावाखालील गोंधळ – या सगळ्यामुळे गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून येत होती. रेल्वे प्रशासनाकडून प्रत्येक वर्षी कोकणात जाणाऱ्यांच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालवल्या जातात. मात्र तरीही वाढलेल्या गर्दीसमोर त्या अपुऱ्या पडतात. जनरल डब्यातील प्रवास हा नुसताच खडतर नाही तर धोकादायकही ठरतो. तरीही पर्याय नसल्याने अनेक प्रवासी आपल्या जीवाची पर्वा न करता जनरल डब्यातून प्रवास करण्यास भाग पडतात.
कोकणकन्या, तुतारी, मांडवी, जनशताब्दी अशा गाड्या कोकणाच्या दिशेने धावत असल्या तरी प्रवाशांची संख्या इतकी मोठी आहे की प्रत्येक डब्यात दुप्पट गर्दी होते. आरक्षित डब्यांसाठी मिळणारी तिकिटे काही मिनिटांतच संपतात. त्यामुळे आरक्षण मिळू न शकलेल्या प्रवाशांची झुंबड जनरल डब्यात उडते. गणेशोत्सव काळात कोकणाकडे जाणे म्हणजे प्रवाशांसाठी एक वेगळाच संघर्ष ठरतो. रेल्वे प्रशासनाकडे सुरक्षा व गर्दी व्यवस्थापनासाठी अधिक पावले उचलण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.