सागर आव्हाड, साम टीव्ही
मुंबई: वांद्रे येथील डॉ. बळीराम हिरे महाविद्यालयात १३२ हून अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या देऊन फसविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करणे, ही सर्वोच्च प्राथमिकता असून त्यांची फसवणूक आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान मुळीच खपवून घेतले जाणार नाही. यामुळे कोणत्याही संस्थांकडून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत.
मागील काही महिन्यापूर्वीच वांद्रे येथील डॉ. बळिराम हिरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरण समोर आले होते, त्याचीही दखल घेत यातील दोषी संस्थांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही मंत्री पाटील यांनी दिले. तसेच महाराष्ट्र राज्य कृषी, पशू व मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च, तंत्र व व्यवसाय शिक्षण यांमधील अनधिकृत संस्था व अनधिकृत अभ्यास पाठ्यक्रम (प्रतिबंध) अधिनियम २०१३मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.
राज्यात सक्षम प्राधिकरणांची मान्यता नसलेल्या विद्यापीठ अथवा अनधिकृत संस्थांचीही मंत्री यांनी दखल घेतली. या संस्थांमध्ये प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना खोटी प्रलोभने दाखवून अथवा संस्था मान्यताप्राप्त आहे, असे भासवून प्रवेश घेण्यास प्रवृत्त केले जाते; मात्र नंतर फसवणूक झाल्याचे निदर्शनास येते. असे अभ्यासक्रम, संस्था यांची मान्यता तपासण्याचे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, वांद्रे येथील डॉ. बळिराम हिरे महाविद्यालयात १३२ हून अधिक विद्यार्थ्यांना बनावट अभ्यासक्रम व पदव्या देऊन फसविल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा आढावा मंत्री पाटील यांनी घेतला.
राज्यातील एक महाविद्यालय आहे त्याला विद्यार्थ्यांची फी पुन्हा द्यावी लागणार आहे या संदर्भातले आदेशही आम्ही दिले आहेत ते कोर्टात गेले असल्याने त्यांना सुनावणीमुळे वेळ दिला आहे सुनावणी झाल्यानंतर पुन्हा त्यांना आदेश देण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्याला एक डायरेक्टर देण्यात यावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत. राज्यात मुलींची फी घेणारे त्याचबरोबर वाढीव फी घेणारे अनेक महाविद्यालय आहेत त्यांच्याही तक्रारी आमच्याकडे आले आहेत त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असं उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्या.