

संयुक्त मुलाखतीत राज ठाकरेंचा भाजपवर थेट हल्ला
भाजपचीही एक्सपायरी डेट असणार असे राज ठाकरे म्हणाले
मोदींमुळे अदानी मोठे झाल्याचा राज ठाकरेंचा दावा
मराठी माणसाने वेळीच जागृत होण्याचं आवाहन
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी भाजप आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला. या निवडणुकीमध्ये भाजपमध्ये बंडखोऱ्या झाल्या. भाजपमधून अनेक जण बाहेर पडले. यावरून राज ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्यांनी पटकथा लेखक सलीम शेख यांनी सांगितलेले एक वाक्य सांगितले. ‘हर एक पॅकेट पे एक्सपायरी डेट लिखी होती है…’ भाजपचीही असणारच.', असे म्हणत राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. या स्फोटक मुलाखतीमध्ये राज ठाकरे नेमकं काय म्हणाले हे आपण पाहणार आहोत...
राज्यातील मराठी माणसांनी वेळीच जागृत होणं गरेजचे आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी जनतेला आवाहन केले की, 'सोल्युशन एकच आहे ते म्हणजे समाज जागृत होणं गरजेचं आहे. ते चुकत असतील तर त्यांना माफ करू नका. आम्ही चुकत असू तर आम्हाला माफ करू नका. पण योग्य कोण?, काम कोण करतंय? त्याआधारे मतदान होणार आहे की नाही? आणि जर चुकीच्याच गोष्टी करणाऱ्या लोकांच्या मागे तुम्ही मतदान करत राहिलात तर समोरचे जे चुका करताहेत त्यांना कधीच कळणार नाही की, या आपल्या चुका आहेत म्हणून.' तसंच, 'या दळिद्री राजकारणाला बाजूला सारून महाराष्ट्राने एक वेगळी झेप घेणं गरजेचं आहे. नाहीतर देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र हा यूपी, बिहारपेक्षा खाली जाईल आणि महाराष्ट्रातील जनतेने जागे रहावे एवढीच फक्त माझी इच्छा आहे.' असे राज ठाकरेंनी सांगितले.
महाराष्ट्रापुढे काहीच नाही असे म्हणत राज ठाकरे म्हणाले की, 'मराठी म्हणून या गोष्टीचा विचार करावाच लागेल. मतभेद असतील… भांडणं असतील, जे काही असेल ते मिटवा. महाराष्ट्रापुढे काहीही नाही. भाजपातील लोक असतील किंवा त्यांच्या बरोबर इतर पक्षांचे जे कोणी सहकारी लोक असतील किंवा अजून कोणी असेल… प्रत्येकानं या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे… नाहीतर महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही.'
राज ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये पीएम मोदींमुळे अदानी मोठे झाल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, 'अदानी आणि अंबानी यांच्यातील मोठा फरक बघायचा असेल तर तो हा आहे की, मोदी मोठे व्हायच्या आधीपासून अंबानी मोठे होते, पण अदानी हा मोदी मोठे झाल्यानंतरच मोठा झाला आहे. अदानीचा विस्तार हे मोदी मोठे झाल्यानंतरचाच आहे. मोदी ज्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्याच वेळी अदानीला मुंद्रा पोर्ट मिळाला आणि मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तर अदानीला अनेक गोष्टी मिळाल्या आहेत.'
राज ठाकरे यांनी भाजपला आणि पीएम मोदी यांना यावेळी थेट सवाल केला. ते म्हणाले की, 'मला नेहमी एक प्रश्न पडतो. भारतीय जनता पक्षाला मला हा प्रश्न विचारायचाय की, समजा तिथे भारतीय जनता पक्षाऐवजी काँग्रेसचे सरकार किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाचं सरकार असतं आणि एखाद्या केंद्रात बसलेल्या सरकारने काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाने जर एकाच उद्योगपतीवर मेहरबानी केली असती, तर भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे रिअॅक्ट झाला असता?'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.