

ठाकरे बंधू २० वर्षांनंतर एकत्र आले
मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार
संयुक्त मुलाखतीत फडणवीस सरकारवर हल्लाबोल
मराठी अस्मितेसाठी एकजूट गरजेची असल्याचे ठाकरे बंधूंनी सांगितले
मुंबई महानगर पालिका निवडणूक ठाकरे बंधू एकत्र लढत आहेत. या निवडणुकीदरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सभा न घेता थेट प्रचारासाठी शाखांना भेटी देत आहेत. या निवडणुकीदरम्यान ठाकरे बंधूंनी सामना वृत्तपत्राला दिलेली संयुक्त मुलाखत ही चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ठाकरे बंधूंची मुलाखत घेतली. ही मुलाखत प्रसिद्ध झाली असून यामध्ये ठाकरे बंधूंनी मुंबई, भ्रष्टाचार, बिनविरोध निवडणूक जिंकणे आणि साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणापर्यंत वेगवेगळ्या प्रकरणावर आपली मतं मांडली आहेत. या मुलाखतीमध्ये ठाकरे बंधूंनी फडणवीस सरकारवर फक्त निशाणा साधला नाही तर त्यांना थेट इशारा देखील दिला आहे. ठाकरे बंधूंच्या या स्फोटक मुलाखतीमध्ये ते नेमकं काय म्हणाले यावर आपण नजर टाकणार आहोत...
ठाकरे बंधू एकत्रित आले याचा आनंद सर्वांना झाला आहे. हे दोघे भाऊ एकत्र यावेत यासाठी अनेकांनी खूप प्रयत्न केले. पण त्यांना एकत्र येण्यासाठी २० वर्षे लागली. मराठी आणि मुंबईच्या अस्मितेसाठी ठाकरे बंधू एकत्रित आले आहेत. या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता. पण ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी महाराष्ट्राला २० वर्षे वाट का पाहाव लागली? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी उत्तर देत नेमकं कारण देखील सांगितले.
राज ठाकरे म्हणाले, 'कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज संकट महाराष्ट्रावर आहे, मुंबईवर आहे, महाराष्ट्रातील अनेक शहरांवर आहे. हे संकट काय आहे हे मराठी माणसाला समजलेलं आहे. काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे याची जाणीव त्याला आहे. ही एकच गोष्ट आम्ही एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही. महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. या विषयावर अनेक वर्षे मी बोलतो ओहे, उद्धवही बोलतो आहे. आज अशा एका वळणावर ही निवडणूक आणि महाराष्ट्र उभा आहे ज्याला आपण ‘अभी नही तो कभी नही’ म्हणतो तशा वळणावर. तशी परिस्थिती मुंबईवर, ठाण्यावर येऊन ठेपलेली आहे. खरं तर एमएमआर रिजनवर येऊन ठेपलेली आहे. एमएमआर रिजन मी मुद्दाम बोलतोय. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. आज एकत्र नाही आलो आणि आज एकजुटीने सामना नाही केला तर मला असं वाटतं, महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार!'
तर उद्धव ठाकरे यांनी देखील दोघे भाऊ एकत्र येण्यासाठी २० वर्षे का लागली यामागचे कारण सांगितले. ते स्पष्ट म्हणाले की, 'खरं तर आम्ही दोन भाऊ एकत्र आलो हा भावनिक मुद्दा आहे. पण दोन भाऊ एकत्र आले याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसानं एकत्र आलं पाहिजे. महाराष्ट्र वाचवायचा असेल तर आपल्याला एकजूट दाखवावीच लागेल. पक्ष, राजकीय मतं वेगळी असतील, पण आपण मराठी आहोत. महाराष्ट्र आपला आहे आणि आपण जर एकमेकांमध्ये वेगळ्या चुली मांडल्या, तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.