संघर्ष गांगुर्डे/साम टीव्ही न्युज
केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा २७ गावांचा प्रश्न पेटला आहे. आम्हाला केडीएमसीत रहायचं नाही, स्वतंत्र नगरपालिका हवीच या घोषणांनी आज डोंबिवली मानपाडा चौक दणाणून गेला. सर्वपक्षीय हक्क संघर्ष समितीने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले. आंदोलनात खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे आणि आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले होते.
संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत असताना कल्याण-डोंबिवली परिसरातील २७ गावांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. स्वतंत्र नगरपालिका स्थापन न झाल्यास केडीएमसी निवडणुकीवर आम्ही बहिष्कार घालू.
आमदार किसन कथोरे यांनी आंदोलनात बोलताना सांगितले की, या गावांची लोकसंख्या वाढली आहे, पण विकास थांबला आहे. त्यामुळे स्वतंत्र नगरपालिका ही काळाची गरज आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री यांना पत्र देत लवकरात लवकर बैठक बोलवण्याची मागणी केली आहे.
तर खासदार बाळ्या मामा म्हात्रे म्हणाले, आज सकाळी मुख्यमंत्री यांच्याशी बोलणं झालं आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. त्या बैठकीत या २७ गावांच्या प्रश्नावर काय निर्णय होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहील.
या आंदोलनात सर्वच पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यामुळे या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळाल्याचं चित्र दिसत आहे. केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं ठरणार असून, आता मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.