CJI Uday Lalit Todays News: भारताचे सरन्यानायाधीश उदय उमेश लळीत यांचा आज महाराष्ट्राच्या राजभवनात सत्कार करण्याता आला. सरन्यायाधीश म्हणून लळीत यांचा कार्यकाळ हा पुढील चार दिवसांत म्हणजेच ८ नोव्हेंबर २०२२ ला संपणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते जस्टीस यू.यू. लळीत (Uday Umesh Lalit) यांना सन्मानित करण्यात आलं.
यावेळी जस्टीस लळीत यांनी आपलं भाषण मराठीतून केलं. मूळचे सोलापूरचे असलेले जस्टीस लळीत (Chief Justice of India) यांनी आजही आपल्या घरात काही प्रमाणात मराठमोळं वातावरण असल्याचं सांगितलं. मात्र, आपल्या मुलांची मराठीची पंचायत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. (Justice U U Lalit Latest News)
मुंबईमध्ये आलोय आणि सत्कार मराठीमध्ये होतोय, त्यामुळे त्याला उत्तर देखील मराठीत देतो. या राज्याचा सुपुत्र या अर्थाने की, जन्म सोलापूरला झालाय, सगळा परिवार सोलापूरचाच आहे. संपूर्ण शिक्षणही महाराष्ट्रात झालंय. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वाटलं की, महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात एकदा तरी जावं. त्यावेळी कॉलेजच्या मित्रांबरोबर मी मोटरसायकलवर महाराष्ट्राचा दौरा केला. पंढरपूरची वारीही केली आहे. त्यामुळे या राज्याशी आणि मातीशी जवळचा संबंध आहे, त्याची मायेची ऊब नेहमी सोबत असते. (Justice U U Lalit Full Speech)
हे खरंय की, माझी कर्मभूमी सुप्रीम कोर्ट आहे. गेली जवळजवळ ३९ वर्ष मी सुप्रीम कोर्टात आहे. आज पंचायत अशी आहे की, माझ्या मुलांना मराठीत बोलता येत नाही कारण त्यांचा जन्म दिल्लीतला आहे. त्यांची विचार करण्याची प्रवृत्ती दिल्लीची, तिकडची आहे. पण, तरीदेखील घरात थोडसं मराठमोळं वातावरण आहे. ज्यावेळी माझा सत्कार करायचं ठरलं त्यावेळी मी सत्काराला हो म्हटलं, पण जमलं नाही. मी म्हटलं की, आता मी त्या दरवाजाजवळ (निवृत्तीजवळ) पोहोचलोय. पण लोकांचा आग्रह असा असतो की त्याला नाही म्हणता येत नाही. (LIVE Marathi News)
या प्रदेशाने खूप काही दिलं. नुसतंच जन्मभूमी आहे म्हणून असं नाही, तर जितकी काही कामं माझ्याकडे आली मी महाराष्ट्रातून जास्त आली. सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातली सुप्रीम कोर्टातली सगळीच कामं माझ्याकडेच यायची, त्यामुळे ते संबंध राहतात. मला त्याचा गर्व आहे, मी जसा आहे या प्रदेशाचा आहे.
आपण आपल्या प्रदेशातून बऱ्याचदा बाहेर जातो. अप्रवासी भारतीय असतात तसेच प्रदेशातले लोकंही असतात, मीही तसाच आहे. अनेक ठिकाणी माझा परिवार फिरत राहिलेला आहे. माझे आजोबा कोकणातून पहिल्यांदा सोलापूरला आले. माझी आजी सोलापूरची पहिली महिला डॉक्टर आहे. पण दुर्देवाने तेव्हापासून माझ्या घरात कुणीही पांढरा कोट घातलेला नाही सगळ्यांनी काळे कोटच घातले. आता माझी वाटचाल फक्त चार दिवसांची राहीली आहे, निवृत्तीचे चारच दिवस राहिले आहेत. पण मी परत-परत येथे येत राहील. ऋणानूबंध हे कायमचे राहतील.
पंढरपूरची वारी करून मी पंढरपूरला पोहोचलो होतो. त्यावेळी मुख्यमंत्री पूजा करत असताना असं वाटलं होतं की, तो मुख्यमंत्री हा पूर्ण राज्यासाठी प्रार्थना करत असतो. तशीच अनुभूती आज आहे की, आज पूर्ण राज्याकडून आपल्याला छोटं मानपत्र का होईना ते मिळतं. तो एक कौतुकास्पद हात पाठीवर राहतो, ती जाणीव खूप असते. तेवढीच जाणीव सदैव रहावी एवढंच बस... असं म्हणत त्यांनी आपलं भाषण संपवलं.
दरम्यान जस्टीस लळीत यांच्या सत्कार समारंभसाठी मुख्य अतिथी म्हणून राज्यपाल भगातसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिपांकर दत्त हेदेखील उपस्थित उपस्थित होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.