

मुंबई महानगर पालिका निवडणुकीबाबात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेना शिंदेगटाने दावा केला आहे. मुंबईत युती झाली नाही तर मुंबईत आमचाच महापौर असेल, असा दावा शिंदेसेनेने केला आहे. हा दावा शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही असे यातून दिसून येत आहे.
संजय गायकवाड यांनी मुंबईचा महापौर आमच्याच पक्षाचा असेल असे विधान करत सांगितले की, 'मुंबईमध्ये जर जिंकायचे असेल तर महायुती झाली पाहिजे. जे महाराष्ट्रात इतर महापालिका आणि नगरपालिकांमध्ये झाले की काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना आपापसात लढली आणि त्याचा फटका आम्हालाच बसला आणि महाविकास आघाडीला फायदा झाला. अद्याप शिवसेनेचा महापौर होईल असे वक्तव्य आमच्या पक्षाच्या नेत्याकडून आले नाही. पण जर महायुती झाली नाही तर आम्ही पण आमचा महापौर करू.', असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
महायुती टिकवण्यासाठी आणि मुंबई जिंकण्यासाठी एकत्र लढणे गरजेचे असल्याचे मत देखील संजय गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. मात्र, युती न झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर जागावाटपाबाबतच्या चर्चा लवकरच करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची महायुती गरजेची आहे. जर युती झाली नाही तर त्याचा फटका महायुतीच्या जागांना बसेल आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल, असे देखील आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असून महापौरपदावरून चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.