
2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज जाहीर होणार.
साध्वी प्रज्ञा सिंह आणि ७ आरोपींना मृत्युदंडाची मागणी केली जातेय.
स्फोटात ६ मृत्यू झाला होता तर १०१ जण गंभीर जखमी झाले होते. पीडितांना आज न्यायाची आशा.
घटनास्थळी सापडलेली मोटरसायकल साध्वी प्रज्ञा यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट.
मालेगावमधील भिक्खू चौकात २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयात निकाल सुनावण्यात येणार आहे. या बॉम्बस्फोटाला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या बॉम्बस्फोटामध्ये ६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता. १०० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल काय असेल, याकडे फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
मालेगावमधील भिक्खू चौकातील मशिदीजवळ २९ सप्टेंबर २००८ रोजी रात्री ९.३५ वाजता हा बॉम्बस्फोट करण्यात आला होता. त्यावेळी रमजानचा महिना सुरू होता. मशिदीजवळच्या एका मोटरसायकवर ठेवलेल्या स्फोटकांद्वारे हा बॉम्बस्फोट घडवून आणला होता. यामध्ये ६ निष्पाप मुस्लिम नागरिकांचा मृत्यू तर १०१ जण जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंबं उध्वस्त झाली होती.
या बॉम्बस्फोटाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. घटनास्थळी सापडलेली मोटरसायकल साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या मालकीची असल्याचे समोर आल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मालेगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकरणाचा तपास प्रथम दहशतवादविरोधी पथकाकडे आणि नंतर एनआयएकडे सोपवण्यात आला होता.
गेल्या १७ वर्षांपासून मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना यापूर्वी जामीन मंजूर करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी एनआयएने साध्वी प्रज्ञा यांच्यासह सात संशयितांना मृत्यूदंडाची मागणी केली होती. आज या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार असल्यामुळे न्यायालय नेमका काय निर्णय जाहीर करतेय याची सर्वजण वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्यांनी या स्फोटात आपल्या जवळच्यांना गमावलं त्यांच्या डोळ्यात आजही आसवं आहेत.'हमे इन्साफ मिलेगा, न्याय होगा...' असे म्हणत त्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.
या बॉम्बस्फोटात १० वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. ती भिक्खू चौकात वडापाव आणण्यासाठी गेली होती पण ती परत आलीच नाही. बॉम्बस्फोट झाला हे कळल्यानंतर लियाकत शेख हे घाबरले. पण आपली मुलगी घरी परत येईल अशी आशा त्यांना होती. मात्र थोड्याच वेळात दुसरा निरोप आला की त्यांची मुलगी फरहिनचा मृत्यू झाला. लियाकत शेख यांनी सांगितले की, 'वडील म्हणून पत्नीसह मी तिथे बघायला गेलो मात्र मला मुलीला पाहू दिले नाही. त्या चिमुरडीचा एक छोटासा गोंडस फोटो हृदयाजवळ लावून आजही तिची आठवण काढणाऱ्या बापाला न्याय मिळेल आणि ज्यांनी हा बॉम्बस्फोट घडवून आणला त्यांना शिक्षा होईल, अशी अपेक्षा त्यांना आहे.
मालेगावमधील ट्रॅव्हल चालक शेख रफिक शेख मुस्तफा हे मुंबईला जायला निघाले होते. भिक्खू चौकात त्यांनी चहा घेतला. त्यानंतर पान खावून मुंबईच्या दिशेने ते रवाना होणार होते पण तेवढ्यात भीषण स्फोट झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांचे कात्रण आणि फोटो दाखवत त्यांचे सासरे असलेले शेख इब्राहिम यांनी ही घटना सांगितली. हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. जावई आणि मुलगी आम्हा वृद्ध सासू सासऱ्यांना सांभाळत होते. बॉम्बस्फोटाच्या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आमचे खूप हाल झाले. त्यानंतर आमचा नातू आता आम्हाला सांभाळत आहे. पण जावयाच्या मृत्यूनंतर जो त्रास आम्हाला झाला तो त्रास बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्यांना झाला पाहिजे. तेव्हा आम्हाला न्याय मिळेल. अशी भावना शेख इब्राहीम यांनी डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या स्थितीत व्यक्त केली. तर वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी आशा मयत रफिक शेख यांच्या मुलाने व्यक्त केली.
तत्कालीन जमीयत उलेमा संघटनेचे मौलाना अब्दुल कय्युम कासमी यांनी या बॉम्बस्फोटानंतर मृत झालेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा यासाठी न्यायालयीन लढाईसाठी मदत केली. मालेगाव शहरातील शांतता बाधित होणार नाही यासाठी विशेष प्रयत्न केले. सुपारी फुटली तरी दंगे फसाद होईल, अशी परिस्थिती मालेगावात असताना देखील पोलिस प्रशासन आणि सरकारच्या आदेशाचे पालन करत आम्ही शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले... आम्हाला 'इन्साफ होना चाहिए ' ही आमची भावना आहे. पुन्हा त्यांनी अशी कृत्ये करू नये म्हणून त्यांना शिक्षा मिळणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया मौलाना अब्दुल कय्युम कासमी यांनी व्यक्त केली.
या बॉम्बस्फोटात जी मोटरसायकल वापरली गेली त्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह कट रचणारे कर्नल पुरोहित, असिमानंद आदींसह त्यांचे सहकारी हे या बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचे वेगवेगळे पुरावे न्यायालयाकडे दिले आहे. हा कट कुठे रचला गेला?, कोणी रेकी केली?, आरोपींच्या लॅपटॉपमध्ये काय मिळाले?, दूरध्वनी संवादात काय चर्चा झाली? याचे सगळे पुरावे एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे सादर केलेले आहेत. त्यामुळे आरोपींना नक्की शिक्षा मिळेल. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याने बॉम्बस्फोटानंतर सुरूवातीच्या काळात वकील म्हणून ज्यांनी काम पाहिले त्या हमदानी इरफाना यांनी सांगितले. तर संविधान आणि न्यायालय यावर आमचा विश्वास आहे, नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशी भावना मालेगावमधील आजी- माजी आमदार यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.