Maharashtra HSC 12th Result 2025 : बारावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलीनेच बाजी मारली आहे. तर कोकणनेही आपली परंपरा राखत अव्वल स्थान पटकावलेय. लातूर विभाग निकालात तळाशी राहिलाय. बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल ९१.८८ टक्के इतका लागलाय.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळ अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात पत्रकार परीषदेत याबाबतची माहिती दिली. आज दुपारी एक वाजता बारावीचा (HSC) निकाल विद्यार्थ्यांना पाहाता येणार आहे. mahresult.nic.in, mahahsscboard.in, आणि hscresult.mkcl.org या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.राज्यात जवळपास ८.२२ टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. आज लागलेल्या बारावीच्या निकालात काही विद्यार्थ्यांना अपयश येऊ शकते. पण आशावेळी खचून न जाता पर्यायी मार्ग अथवा पुन्हा प्रयत्न करणं महत्त्वाचे आहे. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्यास काय कराल?
बारावीच्या निकालात एक किंवा दोन विषयांमध्ये नापास झाला असाल तर टेन्शन घेऊ नका. Supplementary Exam चा विचार करा. जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये होणाऱ्या पूरक परीक्षेला आता नापास झालेले विद्यार्थी पुन्हा बसू शकतात. ही परीक्षा पास झाल्यास विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी पात्र ठरतात. अर्ज प्रक्रिया २० मे नंतर सुरू होईल. या परीक्षेचा निकाल निकाल ऑगस्ट २०२५ मध्ये जाहीर होईल. शाळेमध्ये प्रत्यक्ष जाऊन किंवा बोर्डाच्या संकेतस्थळावर Supplementary Exam साठी अर्ज करावा लागेल.
बारावीच्या परीक्षेत नापास झालात अन् तुम्हाला तुमच्या गुणांबाबत शंका असेल तर रिचेकिंग म्हणजेच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येतो. यासाठी प्रति विषय ३०० रुपये शुल्क आकारले जाते. अर्ज महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकालानंतर दुसऱ्या दिवसांपासूनच उपलब्ध होतो. पुनर्मूल्यांकनानंतर गुण वाढू किंवा कमी होऊ शकतात, आणि हा निकाल अंतिम मानला जातो.
Supplementary Exam मध्येही जर विद्यार्थी पास होऊ शकले नाहीत किंवा दोनपेक्षा जास्त विषयांमध्ये नापास झाले असतील. तर त्यांना पुढील वर्षी (२०२६) पुन्हा बारावीच्या परीक्षेला बसावे लागेल. यासाठी खासगी उमेदवार म्हणून (Form No. 17) नोंदणी करावी लागते. किंवा विद्यार्थी कौशल्य विकास कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. यामुळे त्यांना व्यावसायिक कौशल्ये शिकता येतात आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दरम्यान, ITI किंवा डिप्लोमा अभ्यासक्रम, मुक्त विद्यापीठ (YCMOU), खासगी बोर्डमध्ये बारावी पुन्हा देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
बारावीच्या परीक्षेत नापास होणे म्हणजे सर्वकाही संपले असे होत नाही. पुन्हा तयारी करून बारावीची परीक्षा देता येते. योग्य पर्याय निवडून करिअर पुढे नेता येते. परीक्षेत नापास झाले म्हणून विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता उपलब्ध पर्यायांचा विचार करावा. कोणतेही टोकाचे पाऊल उचलण्याचा विचारही करू नका. परीक्षेत नापास झाले म्हणजे आयुष्यात नापास झाले असे होत नाही. पुन्हा एकदा परीक्षेला बसा अथवा पर्यायी मार्गाचा विचार करा. यशस्वी भविष्यासाठी आत्मविश्वासाने वाटचाल करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.