ठाण्यातील द्रुतगती मार्गावरचा काळजाचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पादचारी पुलावर लावलेला भला मोठा बॅनर थेट रस्त्यावरून जाणाऱ्या धावत्या दुचाकीवर कोसळला. दुचाकीवरील दोघे या घटनेतून सुदैवाने बचावले. असं असलं तरी किरकोळ प्रसिद्धीसाठी अशा प्रकारे बॅनरबाजी करून दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कारवाई करायला हवी, तसेच बॅनरबाजीवर पूर्णपणे बंदी घालायला हवी, अशी संतप्त मागणी नागरिकांकडून होत आहे.
काही वर्षांपूर्वी घाटकोपरमध्ये महाकाय बॅनर कोसळून अनेक जणांना जीव गमवावा लागला होता. ठाण्यातील तीन हात नाका परिसरात घडलेल्या घटनेनं घाटकोपरच्या घटनेची आठवण झाली. वाढदिवसानिमित्त एका संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याच्या कार्यकर्त्यांनी पादचारी पुलावर बॅनर लावला होता. याच पुलाखालून वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या द्रुतगती मार्ग जातो. या मार्गावर दररोज लाखो वाहनांची वर्दळ असते. अशीच वाहनांची वर्दळ असताना, पुलावर लावलेला बॅनर थेट रस्त्यावरून जाणाऱ्या धावत्या दुचाकीवर कोसळला. या दुचाकीवर दोघे जण होते. सुदैवाने या घटनेत त्यांना मोठी दुखापत झाली नाही. पण बॅनर डोक्यावर पडल्याने कदाचित त्यांचा तोल जाऊन मोठा अपघात घडला असता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित नेते, त्यांचे कार्यकर्ते यांच्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. तसेच असल्या बॅनरबाजीवर बंदी घालण्यात यावी, अशीही मागणी नेटकरी करत आहेत.
आजूबाजूला आपण अनेक बॅनर बघतो. मोठाल्या कंपनी आपल्या प्रोडक्टस लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा पद्धतीने प्रचार करत असते. बिल्डिंग्स, फुटपाथवर आपल्याला होल्डिंग्स, बॅनर लावलेले दिसतात. पण हेच बॅनर आता जीवघेणे ठरत आहेत. व्हायरल व्हिडिओत पादचारी पुलावर लावलेले बॅनर अचानक धावत्या दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीस्वार काही क्षणासाठी गोंधळला. दुचाकीस्वाराने वेळेत आपला तोल सावरल्याने मोठा अनर्थ टळला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच ठाणे शिवप्रताप सेनेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेल्या बॅनरमुळे घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्या दुचाकीस्वाराची मी मनापासून माफी मागतो, असे चौधरी म्हणाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि ठाणे महानगरपालिकेने अनधिकृत बॅनरवर कारवाई सुरू केल्यानंतर सुनील चौधरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर माफीनामा प्रसिद्ध केला. कोणालाही इजा पोहोचवणे किंवा कोणाचीही गैरसोय करणे आमचा हेतू नव्हता. ही घटना अनपेक्षित आणि दुर्दैवी होती. भविष्यात अशा प्रकारची कोणतीही घटना घडू नये यासाठी यापुढे बॅनर लावताना सुरक्षेची आणि योग्य ती काळजी घेतली जाईल, असे सांगतानाच त्यांनी माफी मागितली.