
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच आणखी एक अशीच धक्कादायक घटना घडली. अनैतिक संबंधाच्या संशयावरून जालन्याच्या तरुणाची बीडमध्ये मारहाण करून हत्या करण्यात आली. विकास बनसोडे असं या तरुणाचे नाव असून दोन दिवस झाडाला लटकवून त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक केली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. बीड पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहे. विकास बनसोडेसोबत नेमकं काय घडलं याची संपूर्ण हकीकत त्याच्या भावाने पोलिसांना सांगितली आहे.
विकास बनसोडेचा भाऊ आकाश बनसोडे याने पोलिसात जबाब नोंदवला. या जबाबामध्ये त्याने विकाससोबत नेमकं काय-काय घडलं हे सांगितले. तो म्हणाला की, 'माझा भाऊ विकास बनसोडे २०१८ पासून मौजे पिंपरी घुमरी येथे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. २० फेब्रुवारी २०२५ ला तो जालन्यातील घरी परत आला. त्यानंतर १२ मार्चला विकासने मला गाडीचे मालक भाऊसाहेब क्षीरसागर यांनी होळीसाठी बोलावले आहे. मी त्यांच्याकडे जातो असे सांगून निघून गेला.'
आकाश बनसोडेने पुढे सांगितले की, त्यानंतर १५ मार्चला भाऊसाहेब क्षीरसागर यांचा दुपारी फोन आला. त्यांनी मला तुझ्या आई-वडिलांना आणि नातेवाईकांना घेऊन ये आणि विकासला घेऊन जा असे सांगितले. विकासला घेऊन जायचे नसेल तर तसं सांग आम्ही आमच्या पद्धतीने त्याचे काय करायचे ते करतो. आम्ही त्यांना विचारले की काय झाले तर त्यांनी आम्हाला तुम्ही इथे आल्यानंतर सगळं सांगतो असे सांगितले. त्यानंतर मी विकाससोबत काम करणाऱ्या त्याच्या मित्राला फोन करून विचारले असताना त्याने सांगितले की मी आणि विकास भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरी आहोत.
आकाश पुढे म्हणाला की, विकासच्या मित्राने मला सांगितले की विकास आणि भाऊसाहेब यांच्या मुलीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्यांनी आम्हा दोघांना घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवले आहे. स्वाती भाऊसाहेब क्षीरसागर, सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर, संकेत भाऊसाहेब क्षीरसागर, संभाजी झांबरे, सचिन भवर, भाऊसाहेब क्षीरसागर यांचे मोठे दाजी, सुशांत शिंदे, बापुराव शिंदे यांनी आम्हाला बांधुन ठेवले आहे आणि ते आम्हाला दोरी आणि वायरच्या सहाय्याने बेदम मारहाण करत आहेत. महिला आम्हाला शिवीगाळ करत आहेत. तुम्ही आल्यानंतर ते आम्हाला सोडतील तुम्ही लवकर या असे म्हणाला.
आकाशने पोलिस जबाबात असं देखील सांगितले की, 'मी माझे आई-वडील आणि मामासह सर्व नातेवाईक भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरी गेलो. त्यावेळी त्यांच्या घरी भाऊसाहेब क्षीरसागर यांची भावजयी सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर या होत्या. त्यांना मी विकास कुठे आहे? असे विचारले असता त्यांनी मला सांगितले की, विकासच्या पोटात दुखत आहे, त्यामुळे त्याला भाऊसाहेब आणि बाबासाहेब हे कडा येथील सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेले आहेत. त्यानंतर आम्ही सर्वजण कडा येथील सरकारी दवाखान्यामध्ये गेलो. भाऊसाहेब यांना फोन केला असता त्यांचा मोबाईल बंद होता. त्यानंतर मी बाबासाहेब यांच्या मोबाईलवर फोन केला असता त्यांनी मला सांगितले की, विकासला सिव्हिल हॉस्पिटल कडा येथे टाकले आहे. मी पोलीस स्टेशनला आलो आहे त्यानंतर बाबासाहेब यांनी त्यांचा फोन बंद केला.
त्यानंतर आकाश म्हणाला, 'मी कडा सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना माझ्या भावाबद्दल विचारले असता तेथील डॉक्टरांनी सांगितले की, स्विफ्ट गाडीमध्ये २ जण येऊन त्यांनी विकासला दवाखान्यात दाखल करुन नाव गाव न सांगता लगेच निघून गेले. त्यांनतर डॉक्टरांनी विकासची तपासणी केली असता त्यांनी त्याला मृत घोषित केले.' या घटनेमुळे विकास बनसोडेच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.