What Uddhav Thackeray said in Saamana interview : एकनाथ शिंदेंना त्यांची शिवसेना भाजपात विलिन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, कुणी कितीही ठाकरे ब्रँड संपवण्याा प्रयत्न केला तर तो संपणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. सामना वर्तमान पत्राला दिलेल्या मुलाखतीत ठाकरेंनी आपल्या शैलीत भाजप, शिंदेंची शिवसेना आणि मोदी-शाह यांच्यावर टीका केलीच. त्याशिवाय निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही भाष्य केले. ठाकरेंनी राहुल गांधींच्या सूरात सूर मिसळत विधानसभेला वाढलेल्या मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘ठाकरे ब्रॅण्ड’ खतम करण्यासाठी बाहेर काही बॅण्ड वाजत आहेत. त्या बॅण्डवाल्यांचा बॅण्ड महाराष्ट्राची जनता वाजवेल, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. निवडणूक आयोग म्हणजे ‘धोंड्या’ आहे. त्या धोंड्याला शेंदूर फासला तरी ‘शिवसेना’ हे नाव व धनुष्यबाण चिन्ह दुसऱ्याला देण्याचा अधिकार या धोंड्याला नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ‘‘देशाला अशांत, अस्थिर आणि लोकांना सदैव चिंताग्रस्त ठेवायचे हेच भाजपचे धोरण असल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली, त्यामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पक्ष नाही, चिन्ह नाही. तरी फक्त ‘ठाकरे’ या नावावर तुमचा संघर्ष सुरू आहे.
ठाकरे म्हणजे संघर्ष हे समीकरण आहे. सर्व काही चोराल तुम्ही, पण ‘ठाकरे’ हे नाव कसं चोरणार? नाव तर कोणी चोरू शकत नाही. चिन्ह किंवा आणखी काही चोरलं तरी लोकांचं प्रेम कसं चोरणार? लोकांचा जो आमच्यावर विश्वास आहे तो कसा चोरणार?
काही लोकांनी ‘मातोश्री’वरही हक्क सांगण्याचा प्रयत्न केला.
तो त्यांच्या मातोश्रीचा अपमान आहे, जे स्वतःच्या मातोश्रीला मानत नाहीत.
ज्यांनी माझीच शिवसेना खरी आणि माझंच चिन्ह खरं असा भ्रम निर्माण केला, निवडणूक आयोगाच्या किंवा दिल्लीतल्या त्यांच्या मालकांच्या माध्यमातून. ते स्वतःची डय़ुप्लिकेट शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी भाजपमध्ये विलीन करायला निघाले आहेत. याकडे तुम्ही कसं पाहता?
त्यांच्याकडे दुसरा पर्याय काय आहे? त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे केलं त्याचं वर्णन तुम्हीच माध्यमांसमोर अलीकडेच केलंय. दिल्लीत जाऊन किती पाय धुवायचे आणि चाटायचे? त्यातून सगळं चित्रच डोळ्यांसमोर उभं राहिलं. असे जे लोक असतात ते परावलंबीच असतात.
अमित शहा व निवडणूक आयोगाने जी शिवसेना दुसऱ्यांच्या हातात दिलीय, ती अशा प्रकारे भाजपमध्ये कशी विलीन करू शकतात? शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा हा प्रयत्न आहे का?
पण ते संपवू शकत नाहीत. इतकी वर्षे होऊनही ते जनतेला माझ्यापासून तोडू शकत नाहीत. त्यामुळे ‘घालीन लोटांगण वंदीन चरण’ करायचं आणि मालकांच्या पक्षात विलीन व्हायचं हा शेवटचा पर्याय त्यांच्यापुढं आहे. मी याआधी बोललो आहे की, निवडणूक आयोग कदाचित आमचं निवडणूक चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो किंवा गोठवू शकतो, पण ‘शिवसेना’ हे नाव ते दुसऱयाला देऊ शकत नाहीत. त्यांना तो अधिकारच नाही. कारण हे नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिलं आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का? या धोंड्याला पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही. लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही वेडंवाकडं वागलो असू तर गोष्ट वेगळी, पण संविधानानुसार आम्ही काही चूक केली नसेल तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाहीत. मतांची टक्केवारी वगैरे जे काही असेल ते चिन्हापुरतं आहे. नाव दुसऱयाला देऊ शकत नाहीत.
पण त्या धोंड्यानं हे केलं ना!
त्या धोंड्यानं ते बेकायदेशीर केलंय. ‘शिवसेना’ हे नाव त्याला दुसऱयाला देता येत नाही. ते त्याच्या अधिकाराच्या बाहेरचं आहे, पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसल्याने सध्या चालून जातंय.
एक धोंड्या गेला आणि दुसरा खुर्चीवर बसलाय, पण तो निर्णय बदलायला तयार नाही...
पण लोक कोणत्याही धोंड्याचं ऐकणार नाहीत. शेवटी चोरीचा माल आहे. चोरून मतं मिळवलीत आणि त्यावर मर्दुमकी गाजवत असलात तरी चोर तो चोरच.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.