महाराष्ट्रात हिंदी सक्ती विरोधात उभ्या राहणाऱ्या ठाकरे बंधूंच्या आज होणाऱ्या मेळाव्याची अखंड महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे. तब्बल १९ वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र एका व्यासपीठावर दिसणार आहेत. अशातच शिवसेनेचं मुखपृष्ठ असणाऱ्या सामनामध्ये मराठी एकजूट चिरायू होवो, असं म्हटलं आहे. तसेच सरकारवर टीका देखील केली आहे. महाराष्ट्र मेला नाही व मराठी एकजूट भंगणार नाही हे सांगणारा आजचा दिवस मराठी अस्मितेसाठी ऐतिहासिक ठरो, असंही म्हटलं आहे.
महाराष्ट्रात मराठी हिंदी भाषिक वाद जोर धरू लागला आहे. काही दिवसांपूर्वी हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूनी एकत्र येत सरकारच्या जीआरची होळी केली. आणि सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यास भाग पाडले. याच पार्शवभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आज विजयी मेळावा साजरा करणार आहेत. अशातच पुण्यात काल झालेल्या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणा दरम्यान 'जय गुजरात' अशी घोषणा दिली. या घोषणेनंतर महाराष्ट्रात चर्चेला उधाण आले आहे. तर दुसरीकडे उद्योजक सुशील केडीया यांनी "मी महाराष्ट्रात ३० वर्षे राहतो, पण मराठी बोलणार नाही" असे उघड आवाहन राज ठाकरे यांना दिले आहे.
त्यानंतर आता शिवसेनेचं मुखपृष्ठ असणाऱ्या सामना मधून मराठी एकजूट चिरायू होवो म्हणत सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. "दिल्लीत सुरत ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य आल्यापासून महाराष्ट्रावर चारही बाजूंनी प्रहार सुरु आहे. महाराष्ट्राची , मराठी जनांची नाकाबंदी करून त्यांना लाचार आणि शरणागत बनवण्याची एकही संधी सध्याचे भाजपाई दिल्लीश्वर सोडत नाहीत. मराठीचे शत्रू आणि मारेकरी आपल्याच घरात राहतात. शहा सेनेचे नेते एकनाथ शिंदे (मिंधे )पुण्यातल्या कार्यक्रमात जय गुजरात ची घोषणा देऊन शहांसमोर मराठी बाण्याची ऐशी का तैशी केल्याचं सामना अग्रलेखातून म्हटलं आहे.
दरम्यान आज होणाऱ्या या भव्य विजय मेळाव्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. हा विजयी मेळावा वरळीतील डोम सभागृहात होणार असून या विजयी मेळाव्यासाठी मनसैनिक आणि ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी जय्य्त तयारी केली आहे.
ठाकरे बंधूंचा आजचा विजयी मेळावा शिवतीर्थावर का नाही? सामानातून स्पष्टता
मराठी भाषेची अस्मिता टिकवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष आणि पुढारी एक झाले. त्या ऐक्यात तेजाने, शक्तीने, विचाराने उजळून दिसले ते अर्थात 'ठाकरे' भाऊ! उद्धव आणि राज ठाकरे हे ५ जुलैच्या हिंदी सक्तीविरोधी मोर्चात आपल्या फौजफाट्यासह एकत्र येत आहेत व त्या दिवशी मुंबईच्या रस्त्यावर अस्सल मराठी राडाच होईल या भयाने सरकारने महाराष्ट्रावर लादलेली हिंदी सक्ती रद्द करीत असल्याचे जाहीर केले. मराठी माणसे एकत्र आली की, काय चमत्कार घडतो त्याचे हे उत्तम उदाहरण. वरळीच्या भव्य सभागृहात यानिमित्ताने मराठी जनांचा विजयोत्सव साजरा होत आहे. खरे तर अशा मराठी विजयी मेळाव्यांना कोणतेही मोठे सभागृह पेलणार नाही.
त्यासाठी मराठी माणसाचे हक्काचे शिवतीर्थच हवे होते. लढा संयुक्त महाराष्ट्राचा असेल, महाराष्ट्र स्थापनेचा असेल, नाहीतर शिवसेना स्थापनेचा, मराठी जनांनी आपला प्रत्येक विजयी सोहळा शिवतीर्थावरच गाजवला आणि आपल्या विराट शक्तीचे दर्शन घडवले, पण सध्याचे 'मिंधे' फडणवीस सरकार मराठी विजय उत्सवास सहकार्य करण्यास तयार नाही.त्यामुळे आजचा विजय सोहळा शिवतीर्थावर होऊ शकत नाही. अर्थात, तरीही मराठी माणसाच्या उत्साहाला आजच्या विजयी मेळाव्याने उधाण आलेच आहे. जणू स्वर्गातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या मराठी जनांना 'चलो वरळी'चे आवाहन करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.