सोलापूर : मागील काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अर्थात भीमा नदीतील पाण्याची पातळी कमी होऊ लागली होती. यामुळे आगामी काळात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. दरम्यान यावर तोडगा म्हणून भीमा नदीत आजपासून उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे नदी काठच्या गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण उजनी धरणातून आजपासून सोलापूरकरांसाठी भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगरपरिषद आणि भीमा नदीकाठच्या ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी हे आवर्तन आजपासून सोडलं जाणार आहे. आज सकाळी नऊ वाजल्यापासून १६०० क्युसेक इतका विसर्ग उजनीतून भीमा नदी पात्रात सोडला जात आहे.
उजनीत १९ टक्केच जिवंत पाणीसाठा
उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता १२३ टीएमसी इतकी असून आज घडीला उजनी धरण केवळ १९ टक्के प्लसमध्ये आहे. उजनीत केवळ १० पूर्णांक १९ टीएमसी इतका जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात उजनी धरण हे मायनसमध्ये जाण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. आज १६०० क्युसेक इतका विसर्ग केला जात असून हळूहळू त्यामध्ये वाढ करून तो ६००० क्युसेक इतका केला जाणार आहे.
पाणी प्रश्न सुटणार
दरम्यान भीमा नदीत उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने सोलापूर शहरासह नदी काठच्या गावांमधील पाण्याचा प्रश्न सध्या तरी मिटणार आहे. मात्र पुढील काळात धरणातील पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने पाण्याची समस्या देखील निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.